मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१३

जमेल तसे ..थोडक्यात !

जमेल तसे ..थोडक्यात !


 व्यसनाधीनता म्हणजे नेमके काय ? व्यसनमुक्ती केंद्रात काय उपाय केले जातात ? उपचारांचे महत्व ..सुधारणेची प्रक्रिया याबाबत जमेल तसे विवेचन देण्याचा प्रयत्न दोन तीन भागात करीत आहे



अनेकांना व्यसनमुक्ती केंद्रात नेमके काय उपचार करतात ..व्यसनाधीनता हा मनोशारीरिक आजार कसा जडतो ... एकंदरीत सुधारणेची प्रक्रिया कशी असते ....काही लोकांना वारंवार उपचार का द्यावे लागतात ..याबद्दल कुतूहल असते .... याबद्दल खालीलप्रमाणे माहिती देता येईल ...

दारूसकट सर्व प्रकारच्या मादक पदार्थांना शास्त्रीय भाषेत ' माइंड अल्टरिंग सबस्टन्स ' असे संबोधले जाते याचा अर्थ मनोवस्थेत बदल करणारे पदार्थ किवा मनोव्यापरावर परिणाम करणारे पदार्थ असे म्हणता येईल ..या पदार्थांच्या यादीत आपल्याला माहित असलेली अनेक नवे आहेतच उदा. दारू ..ताडी ...माडी ..गांजा ..चरस ..भांग ..अफू व त्या पासून तयार होणारे इतर मादक पदार्थ म्हणजेच ब्राऊन शुगर ..हेरोईन ..मोर्फिन ..नोर्फीन ..फोर्टविन .. विविध प्रकारची वेदनाशामके ... गुंगी आणणारी औषधे ..काही कफ सिरप्स कोरेक्स ..कोडीन.. स्पाज्मो प्राँक्सीवाँन च्या गोळ्या ....विविध प्रकारची झोपेची औषधे वगैरे ... मँड्रेकसच्या गोळ्या ...निम्नविषारी सापांचे विष ..भारतात नवीन प्रचलित झालेले व्हाईटनरचे थिनर ..या यादीत अनेक नवीन मादक द्रव्यांची नियमित भर पडत आहे . यांचे सेवनाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत ..यातील काही पदार्थ सिगरेट मध्ये भरून ..चीलीमित भरून .. त्यांचा धूर शरीरात ओढतात .. काही पदार्थ इंजेक्शन्स द्वारे शिरेत टोचून घेतले जातात ..काही तोंडावाटे घेतले जातात ..तर काही नाकाद्वारे हुंगले जातात ...या सर्व पदार्थांचे अतिशय भयानक दुष्परिणाम सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर ..आर्थिकतेवर ..कुटुंबावर ...त्याच्या सामाजिक स्थानावर .व त्याच्या अध्यात्मिक स्थितीवर होतात . तसेच या सर्व पदार्थांची सेवन करणाऱ्या व्यक्तीला आधीन करण्याची क्षमता खूप जास्त असते ..एकंदरीत दुष्परिणामांची तुलना करता .. दारू किवा अल्कोहोल आणि वर उल्लेखलेले मादक पदार्थ यांच्यात तुलनात्मक रित्या दारूचे व्यसन म्हणजे विनाशाकडेकडे नेणारी स्लो पँसेंजर गाडी आहे तर इतर मादक पदार्थ या विनाश्याच्या सुपरफास्ट गाड्या आहेत इतकाच फरक आहे ...

प्रत्येक मानव हा जीवनात त्याला भरपूर आनंद मिळावा ..जमेल तितकी मौज अनुभवावी ..नेहमी आपण खुश रहावे प्रकारचे या मनोवृत्तीचा असतो .. विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ ..विविध प्रकारचे रंगीबेरंगी कपडे त्याच्या नीरनिराळ्या तऱ्हा..सिनेमा ..नाटके..मनोरंजन .. उंची गाड्या .. मोठे मोठे बंगले ..सोन्याचांदीचे दागिने ....भरपूर पैसा कमावणे ..वेगवेगळ्या प्रकारांनी लैंगिक इच्छांची पूर्ती करणे ..जास्तीत जास्त लैंगिक संबंध जोडणे .. सौंदर्य प्रसाधने ..अधिकार गाजवणे ..सत्ता मिळवणे .. पर्यटन ..कला ..क्रीडा ..साहित्य ..काव्य .. धार्मिकता असे आनंद मिळविण्याचे विविध मार्ग उपलब्ध आहेत .. ज्याला जो मार्ग पटेल ..जमेल त्या मार्गांचा वापर करून प्रत्येक व्यक्ती जीवनात असलेली निरसता..तोचतोच पणा कंटाळा ..दुखः ..तणाव .. निराशा ..वैफल्य या नकरात्मक भावना कमी करण्याच्या मागे असतो ..अनेकदा यात वेगळेपणा हे देखील हेतू असतो तर काम ..क्रोध ..लोभ ..मद ..मोह .मत्सर या विकारांच्या पूर्तीसाठी देखील असे विविध आनंद मिळविण्याचे मार्ग चोखाळले जातात ... अनेक लोक आनंद मिळविण्याच्या वरील मार्गांनी देखील अविवेकी वर्तनाने अतिरेक करून स्वतःवर दुखः ओढवून घेऊ शकतात ...मात्र अध्यात्मिक तत्व जाणून घेतले तर स्वतची कर्तव्ये ..जवाबद-या.. प्रामाणिकपणे पार पाडणे .. आपल्या आसपासच्या व्यथित लोकांना मदत करणे .. समाजातील दुर्बल ..समस्याग्रस्त लोकांना आधार देणे ..आपल्या कलागुणांचा उपयोग करून इतरांना आनंद देणे ..भोगा पेक्षा त्याग अनुसरणे ई .या गोष्टीत खरा आनंद व पुरुषार्थ मानला जातो !

काही जण असा आनंद मिळविण्यासाठी मादक पदार्थांचा आधार घेतात .. या पदार्थांच्या सेवनाची सुरवात जरी आनंदाचा शोध ..मित्रांचा आग्रह ..तणावमुक्ती ..श्रमपरिहार ..चांगली झोप .. एखाद्या व्यथेला विसरणे ..संगत..अनुकरण ..वगैरे मार्गांनी झाली असली तरी यांचे होणारे दुष्परिणाम थोड्याफार फरकांनी सारखेच विनाशकारी ठरतात . 

मादक द्रव्यांचे सेवन केल्यानंतरची होणारी शरीर मनाची अवस्था ही अत्यंत सुखदायी असते म्हणजे यांचे सेवन केल्यावर येणारी सुरवातीची तात्पुरती अवस्था बहुधा प्रत्येकाला आवडणारी असते .. तणावमुक्तीचा अनुभव ..मनमोकळेपणा .. कल्पनाशक्ती जागृत झाल्याचा आभास ..रसिकता बहरणे .. आपण खूप शक्तिशाली आहोत .. धैर्यशाली आहोत .. शूर आहोत .. वाट्टेल ती समस्या चुटकी सरशी सोडवू शकतो असा आत्मविश्वास वाटणे ..पटकन गाढ झोप येणे ..असे प्रकार अनुभवास येतात ..हे सर्व अनुभव मानवी मेंदूत... जो एखाद्या संगणका प्रमाणे आहे त्यात बहुधा ' मजा आया ' या हेड खाली संग्रहित केले जातात .. किवा त्यांची वेगळी फाईल तयार होते व सेव्ह होते . मग स्वाभाविक पणे असा मजा पुन्हा पुन्हा घेण्याची ओढ निर्माण होते ..जे लोक जास्त संवेदनशील असतात .. मनस्वी असतात या लोकांच्या बाबतीत हो पुन्हा अनुभव घेण्याची ओढ तुलनेत इतरांपेक्षा अधिक असते !

( पुढील भागात अधिक माहिती )

आजाराची सुरवात - विनाशाची सुरवात !

प्रथम सेवना नंतर जी मेंदूच्या संगणकात ' मजा आया ' अशी फाईल तयार झाली ती अधून मधून जेव्हा जेव्हा ..व्यक्तीची मानसिक अवस्था ..कंटाळा आलाय ..बोअर झालोय .. खूप ताण जाणवतोय .. काहीतरी कटकटी होत आहेत .. अवस्थता वाढलीय अशी होते तेव्हा पुन्हा एकदा तो मजा घे अशी आठवण करून देत राहते ..व संधी मिळेल तसे पुन्हा त्या व्यसनाचे सेवन केले जाते ..व मेंदूतील ही फाईल अधिक शक्तिमान होत जाते ....वर सांगितल्यानुसार जे लोक मानसिक दृष्ट्या अधिक मनस्वी ..संवेदनशील .. हळवे ..किवा हट्टी ..जिद्दी ..स्वतच्या मनात येईल त्याप्रमाणे जीवन व्यतीत करायला मिळाले पाहिजे अश्या मनोवृत्तीचे असतात ते किवा निराशावादी मनोवृत्तीचे .. वैफल्यग्रस्त ..बंडखोर स्वभावाचे असतात ..व्यक्तिगत जीवनात कसल्यातरी कारणाने नाराज असतात अस असे लोक पुन्हा पुन्हा तो आनंद घेण्याची शक्यता वाढते ..त्या नुसार ते तसे करत राहतात ..पुढे त्या उसन्या आनंदाचा मनावर इतका पगडा बसतो की त्यापुढे जीवनातील इतर आनंद तुच्छ वाटू लागतात ..



मग वारंवार सेवन करण्याचे प्रमाण वाढत जाते .. व पूर्णतः मानसिक गुलामीची अवस्था येते ..म्हणजे व्यसन केल्याशिवाय करमत नाही ..मन सारखे व्यसनी मित्रांकडे ओढ घेते .. व्यसन केल्यानंतरची ती अवस्था आठवत राहते व वर्तमान जीवन निरस वाटू लागते ..झोप ..जेवण ..लैंगिक सुख .. मनोरंजन .. या साऱ्या कल्पना त्या व्यसनाशी निगडीत होतात ..व्यसन केल्याशिवाय आत्मविश्वास जाणवत नाही .. मग कॉलेज ..ऑफिस .. घर .. या सगळ्या ठिकाणच्या छोट्या मोठ्या तक्रारींसाठी व्यसन हा उपाय अनुसरला जातो .. सतत त्या धुंदीत रहावेसे वाटू लागते .व्यसनाला विरोध करणाऱ्या व्यक्ती शत्रू आहेत ..उगाचच आपल्या आनंदाच्या आड येत आहेत ..असा समज निर्माण होत जातो ..त्याच वेळी मनाचा अंहकार स्वतः व्यसनी झाल्याचे कबूल करण्यास तयार होत नाही .. आपण पाहिजे तेव्हा व्यसन सोडू शकतो .. व्यसन सोडणे काही फार मोठी गोष्ट नाही .. आसपासची परिस्थिती .. वातावरण .. वगैरे माझ्या अनकूल झाल्यास मी केव्हाही व्यसन सोडू शकीन असा खोटा आत्मविश्वास वाटतो . मात्र हे एक सार्वत्रिक सत्य आहे ..की आसपासची परिस्थिती .. वातावरण ..लोकांचे वर्तन .. जीवनातील सर्व घटना या कधीच कोणाच्याही मनासारख्या असू शकत नाही ...लोक त्यातल्या त्यात आहे त्या परिस्थितीत जगण्याचा प्रयत्न करत ..अनेक ठिकाणी स्वतच्या इच्छांना मुरड घालून जगतात . वेळ पडेल तशी ' अँडजेस्टमेंट ' करत .. ..स्वतः मध्ये बदल करीत ..संघर्ष ..तणाव .. अपयश झेलत .. जीवनावर श्रद्धा ठेवून जगतात ..एकदा व्यसनाची मानसिक गुलामी आली की व्यसनी व्यक्ती मात्र अशी जीवनाशी ' अँडजेस्टमेंट ' करत जगणे म्हणजे बुळेपणा मानतो ..

स्वतच्या मर्जी नुसार जगायला मिळावे या अट्टाहासामुळे पुन्हा पुन्हा व्यसन करत जातो ..त्यातच घरात इतर कोणी थोड्या प्रमाणात देखील व्यसन करणारे असेल तर ...हा देखील इतरांशी स्वतची तुलना करून मी प्यायलास काय बिघडले असे स्वतःला समजावत पीत राहतो ..कोणी उपदेश केल्यास ..विरोध केल्यास .. स्वतच्या अनंत ..अडचणी ..दुखः .. अपयश यांचा पाढा वाचून आपल्या व्यसनाचे समर्थन करत जातो किवा ..खूप रागावतो ..इतरांना दोष देतो .. भांडण करतो .. याच दरम्यान व्यसनाची शारीरिक गुलामी देखील सुरु झालेली असते ..म्हणजे ठराविक वेळेस व्यसन न केल्यास शरीरात वेदना होणे .. अशक्तपणा जाणवणे .. काहीही करण्याची इच्छा नसणे ..हात पायांची थरथर ..उलट्या ..आम्लपित्त वाढणे ..शरीराचा प्रत्येक कण ते व्यसन मागत राहतो .. मन तडफडते ..व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी खोटे बोलणे ..किरकोळ चोऱ्या करणे ..उधारी करणे ..कर्जे घेणे सुरु होते . दारूच्या बाबतीत हे गोष्टींचे प्रमाण इतर मादक पदार्थांच्या तुलनेत कमी असते ..याचे कारण इतर मादक पदार्थांची सेवन करणाऱ्या व्यक्तीला आधीन करून घेण्याची क्षमता म्हणजे ' अँडीक्टीव्ह पॉवर खूप अधिक असते.. मादक द्रव्यांच्या बाबतीत ही गुलामीची अवस्था केवळ चार पाच वेळा सेवन केले तरी येवू शकते ..तर दारूच्या बाबतीत अशी गुलामी येण्यास थोडा अधिक वेळ लागतो ...

एकदा गुलामी सुरु झाली की खालील प्रकारचे नुकसान होत जाते .

१) शारीरिक नुकसान - यकृत ( लिव्हर ), मूत्रपिंड , शरीराच्या सर्व रक्तवाहिन्या , फुफुस्से , त्वचा , डोळे , अश्या सर्व महत्वाच्या भागांवर या व्यसनांचे परिणाम होऊन अकाली मृत्य , कायमचे नपुंसकत्व , क्षयरोग , कावीळ , कॅन्सर असे भयानक आजार होण्याची शक्यता .

२) मानसिक नुकसान - मन अधिक अधिक कमकुवत होऊन आत्मविश्वास नष्ट होणे , आळस वाढणे , चिडचिड होणे ..भावनिक अस्थिरता निर्माण होणे , मेंदूच्या कार्यशैली वर परिणाम होऊन डिप्रेशन , स्किझोफ्रेनिया , आब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डीसऑर्डर , वगैरे गंभीर मानसिक आजार होणे .. काही केसेस मध्ये व्यसनी व्यक्ती ठार वेडा झाल्याची देखील उदाहरणे आहेत . .

३) आर्थिक नुकसान - नोकरीवर दांड्या , व्यवसाय डबघाईस येणे ..उधाऱ्या ..कर्जे वाढणे ..कौटुंबिक गरजांकडे दुर्लक्ष .. नोकरी वरून काढून टाकणे .. व्यवसाय बुडणे , घरातील दागिने विकणे .. वगैरे

४ ) कौटुंबिक नुकसान - कुटुंबात भांडणे ..कलह निर्माण होणे ..परस्परविश्वास नष्ट होणे ..कुटुंबातील व्यक्तींना मारहाण ..व्यसनीच्या .कुटुंबातील लहान मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येवून ती बिघडण्याची शक्यता वाढणे ..पती- पत्नीतील बेबनाव , प्रकरण घटस्फोटा पर्यंत जाणे ,

५) सामाजिक नुकसान - समाजात व्यसनी व्यक्तीची पत कमी होणे , नशेत सामाजिक उपद्रव ....भांडणे ..शिवीगाळ वगैरे ..व्यसनी व त्याच्या कुटुंबियांना उपेक्षित करणे ...प्रकरण काहीवेळा पोलीस स्टेशन पर्यंत जाणे...

६ ) अध्यात्मिक नुकसान - खोटे बोलणे ..चोरी करणे ..हिंसा करण्यास प्रवृत्त होणे .नशेच्या भरात एखादा गंभीर गुन्हा घडून तुरुंगवास ..

( बाकी पुढील भागात )

आजाराची वैशिष्ट्ये ...!

एकदा व्यसनाची मानसिक व शारीरिक गुलामी सुरु झाली की मग व्यसनी व्यक्ती कशालाही आणि कोणालाही न जुमानता व्यसन करत जातो ..जणू ' व्यसन करणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ' या तालावर त्याचे जगणे सुरु होते ...व्यसनाचे समर्थन करण्यासाठी त्याच्याकडे हजारो कारणे असतात ..स्वतच्या शारीरिक शक्तीचा . ..मानसिक शक्तीचा ..बुद्धीचा ..आणि सर्व प्रकारच्या क्षमतांचा वापर करून व्यसन करत जातो ..स्वतचा तो उत्तम वकील झालेला असतो ..व्यसन करण्यामागील त्याचे युक्तिवाद इतरांना कितीही मूर्खपणाचे वाटले तरी त्याला त्याची पर्वा नसते ..फार थोडे भाग्यवान लोक असे आहेत की.. प्रिय व्यक्तीची शपथ .. एखाद्या देवाची शपथ किवा देवाच्या नावाने घातलेली माळ ..आयुष्यात व्यसनामुळे घडलेली एखादी दुर्घटना .. वगैरेमुळे ते एका फटक्यात कायमचे व्यसन सोडू शकतात .. बाकी बहुसंख्य व्यसनी व्यक्तींवर शपथ -वचने , देव -धर्म , मंत्र -तंत्र , याचा दीर्घकाळ परिणाम होत नाही ..काही दिवस रेस्ट घेतल्यासारखे ते व्यसन बंद करतात ..आणि अनपेक्षितपणे केव्हाही पूर्वीच्याच जोमाने पुन्हा व्यसन सुरु करतात ..कायमची व्यसनमुक्ती त्यांच्या बाबतीत अवघड होऊन बसते ...अश्या लोकांच्या बाबतीत काही निरीक्षणांच्या आधारे या भयावह आजाराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगितली जातात .


धूर्त किवा कावेबाज आजार --

१) व्यसनी व्यक्तीच्या मनात व्यसनाचे आकर्षण वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच तयार असते ..काही काळ तो एकदम चमत्कार झाल्यासारखा व्यसन बंद करू शकतो ... व त्याला स्वतःलाच असे वाटते की ..आपण पाहिजे तेव्हा बंद करू शकतो म्हणजे आपण व्यसनी झालेलो नाही ...पुन्हा कधी तरी मर्यादित प्रमाणात आपण पिऊ शकू .

२) आसपासच्या व्यसनींचे होणारे नुकसान पाहूनही .. प्रत्येक व्यक्तीला माझ्या बाबतीत अशी वेळ किवा असे नुकसान कधीच घडू शकणार नाही असे प्रामाणिक पणे वाटत राहते..मी काही तेव्हढा पीत नाही .. मी तितका मूर्ख नाही .. असे स्वतःला बजावतच तो व्यसन करत राहतो .

३) व्यसनामुळे झालेल्या नुकसानाला तो आपल्या व्यसनामुळे हे नुकसान होतेय असे न मानता जीवनातील इतर अडचणी ..समस्या ..संकटे .. दुर्घटना किवा आसपासच्या लोकांना जवाबदार धरतो ..त्यामुळे त्याच्या जीवनातील समस्यांवर व्यसन सोडणे हा काही उपाय नाही असे त्याला मनापासून वाटते .

४) जगात कोण पीत नाही ? मी प्यायलो तर त्याचा लोकांनी इतका बाऊ करण्याची काय गरज ?. मी तर फक्त व्यसन करतो ..जगात अनेक लोक माझ्यापेक्षा जास्त अप्रामाणिक आहेत ..चोऱ्या करतात ..भ्रष्टाचार करतात ..खून-दरोडे ..बलात्कार अशी पापे करतात ..त्यांच्या तुलनेत मी तर फक्त व्यसन करतो अशी व्यसनाला समर्थन देणारी विचारसरणी तयार होते . म्हणजे ' I am not as bad ' अथवा मी काही तेव्हढा वाईट नाही असे त्याला वाटते .

५) मी व्यसन करून फक्त माझेच नुकसान करतोय ..इतरांनी त्याकडे दुर्लक्ष करावे ..मी कधीच कोणाचे वाईट चिंतले नाही ..माझ्या व्यसनामुळे कोणालाच काहीच त्रास होत नाहीय ..कधी कधी भांडणे होत असतील ..नुकसान होत असेल ..मात्र त्याचे कारण व्यसन नाहीय तर परिस्थिती .. लोकांचे वर्तन ..त्यास कारणीभूत असते असे त्याचे ठाम मत बनते .

६) जगातला सगळ्यात दुर्दैवी ..फसवला गेलेला .. दुखी: ..कमनशिबी ..अन्यायग्रस्त असा व्यक्ती मी आहे असे वाटून माझ्या जीवनातील सर्व समस्या ..संकटे ..अडचणी या वर व्यसन हा एकमात्र उपाय आहे अशी त्याची श्रद्धा असते .

७) काही काळ व्यसन बंद केल्यावर ..आपले व्यसन कायमचे सुटले अशा अविर्भात तो वावरतो ..आणि व्यसन सोडले की लगेचच लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवावा ..व्यसनामुळे झालेले सारे नुकसान लगेच भरून निघावे .. मला पूर्वीसारखाच मन सन्मान ..पैसा ..मिळावा .. सर्व काही माझ्या मनासारखे सुरळीत घडावे असे वाटून जर तसे घडले नाही तर तो पुन्हा व्यसन सुरु करतो ..व्यसन सोडूनही काही फायदा नाही असे म्हणत राहतो .

( बाकी पुढील भागात )

गोंधळात टाकणारा आजार !

मागील भागात आपण व्यसनाधीनता या मनोशारीरिक आजाराची व्यसनी व्यक्तीच्या मानसिकतेत बदल करणारी धूर्त व कावेबाज पणाची वैशिष्ट्ये पहिली ..त्याच प्रमाणे हा आजार व्यसनी व्यक्ती व त्याचे नातलग यांच्यात एक गोंधळाची विचारसरणी निर्माण करतो ज्या मुळे उपचार व सुधारणा याबाबत त्यांचा नेहमी गोंधळ उडतो ..तो पुढील प्रमाणे !



गोंधळा निर्माण करणारा आजार !



१) दारू अथवा मादक पदार्थांचा व्यसनी म्हंटल्यावर आपल्या सर्वांच्या मनात जी प्रतिमा उभी राहते ती काहीशी अशी असते ..विस्कळीत कपडे .. वाढलेली दाढी ....खंगलेले शरीर .. नोकरी व्यवसाय गेलेला .. उधार पैसे ..कर्जे मागणारा .. घरातून हाकलला गेलेला .. पत्नी मुलांना वाऱ्यावर सोडलेला असा व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो ... मात्र ही प्रतिमा व्यसनाधीनता या आजाराच्या अंतिम अवस्थेची असते .. प्रत्येक व्यसनी बहुधा स्वतची तुलना अशा प्रतीमेसोबत करून माझी काही तशी अवस्था झालेली नाही .. म्हणजे मी काही व्यसनी झालेलो नाही असे म्हणतो ..नातलगांचा देखील तो तसाच समज करून देतो ... अर्थात तो नकळत त्या प्रतिमेच्या अवस्थेकडे वाटचाल करीत राहतो .

२) इतकी वर्षे चांगला वागणारा ....सर्व गोष्टीत हुशार असणारा ..गुणी असा आपला नातलग असा एकदम काही महिन्यात किवा काही वर्षात व्यसनाच्या आहारी गेलेला पाहून ..तो व्यसनी झालेला आहे व त्याला योग्य असे शास्त्रीय उपचार द्यावे लागतील हे त्याच्या जवळच्या नातलगांना पटणे कठीण असते .. त्यांना वाटते .. याच्या वर काहीतरी करणी झालीय ..कोणीतरी काही तरी खावू घातलेय ..बाहेरचे काहीतरी झालेय ..त्याला एखादे खूप मोठे दुखः झालेय ..किवा ग्रह ..तारे खराब आहेत ..शनी लागलाय मागे ..वगैरे अविवेकी विचार त्यांच्या मनात घर करून राहतात मग पत्रिका ...जोतिषी.. ग्रहांच्या अंगठ्या .. अंगारे धुपारे सुरु होतात .. तर काही ठिकाणी व्यसनी व्यक्तीच्या मनासारखे आपण वागले तर तो बदलेल अशी आशा नातलगाना असते .. म्हणून तो म्हणेल त्या वस्तू त्याला घेवून देणे ..त्याला हवा तो व्यवसाय काढून देणे .. त्याचे लग्न करणे ..घराच्या वाटण्या करून त्याला संपत्तीचा त्याचा हिस्सा देणे ..वगैरे त्याच्या व्यसनाला खतपाणी घालणारे प्रकार केले जातात .

३) व्यसनी व्यक्तीच्या बिघडण्याला घरातील कोणीतरी कारणीभूत आहे ..किवा त्याचे मित्र जवाबदार आहेत ..असे वाटून घरात व्यसनी व्यक्तीच्या बिघडण्यावरून एकमेकात भांडणे होऊ शकतात .. एकमेकात भांडणे ..अबोला व इतर समस्यांमुळे ..घरातील एकोपा संपतो ... पत्नी आणि व्यसनीचे पालक यांच्यात दुरावा निर्माण होतो ... व्यसनीची भावंडे व पालक त्याच्या व्यसनाला पत्नीला किवा पत्नी नवर्याच्या व्यसनाला पालकांना जवाबदार ठरवते..स्वाभाविक व्यसनी व्यक्तीकडे दुर्लक्ष होते ..किवा त्याला व्यसन करायला आणखीन एक नवीन कारण मिळते .

४ ) मी पूर्वी थोडा पीत होतो ...आता माझे पिणे वाढलेय याला कारण व्यसनी व्यक्ती बाहेरच्या परिस्थितीत शोधतो .. किवा पूर्वी मी अनेक वेळा व्यसन बंद केलेय ..म्हणजे मी व्यसनाच्या गुलाम नाही .. कधी कधी जास्त होते इतकेच ..असा विचार करून व्यसनी उपचार घेण्याचे नाकारतो .. आपण आपल्या इच्छाशक्तीवर व्यसन कधीही सोडू शकतो असा खोटा आत्मविश्वास विचारात निर्माण होतो ..मात्र व्यसनामुळे आपल्या इच्छाशक्ती वरच हल्ला केलाय .. विशिष्ट बाबतीत आपली इच्छा शक्ती मदत करू शकणार नाही हे त्यला पटणे कठीण होते .

५) काही जास्त जिद्दी किवा हट्टी लोकांना व्यसनमुक्ती केंद्रात एकापेक्षा जास्त वेळा उपचार घ्यावे लागतात ..अशा वेळी केवळ एकदाच उपचार देवून ..मग त्याचा काही फायदा झाला नाही ..तेव्हा उपचार देणे व्यर्थ आहे ..उगाच पैसा जातो..असा अव्यवहारी विचार पालक करतात .. त्यांच्या हे लक्षात येत नाही की पुन्हा उपचार दिले नाहीत तर हा व्यक्ती असाच पीत जाणार आहे ..अधिक अधिक नुकसान करणार आहे स्वतचे व कुटुंबाचे देखील ..या सर्व कालावधीत तो जे शारीरिक ..मानसिक ..आर्थिक,,व इतर प्रकारचे नुकसान करेल त्याच्या तुलनेत ..व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा खर्च नक्कीच परवडतो .

६) व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होणे म्हणजे काहीतरी री मोठे पाप आहे असा समज व्यसनी व्यक्ती तसेच कुटुंबियांचा देखील झालेला असतो ..कारण पालक बहुधा व्यसनमुक्ती केंद्रात मुलाला किवा नातलगाला दाखल केलेय असे सांगायला कचरतात .. व्यसनी व्यक्ती देखील तसे बाहेर कोणाला कळू नये याची दक्षता घेतो ..अर्थात त्यामागे हा एक मनो शारीरिक आजार आहे व उपचार घेणे केव्हाही चांगले ही भूमिका असत नाही . त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्राच्या लोकांना पालक सांगितले जाईल तसे सहकार्य करत नाहीत .. तर व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडण्यासाठी आतुर असलेल्या व्यसनी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला जातो ..अनेकदा व्यसनमुक्ती केंद्रात अर्धवट उपचार दिले जातात ..किवा दीर्घकालीन उपचार देणे टाळले जाते .

७) व्यसनाचा मनावर असलेला पगडा कायमचा रहातो .. त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेवून बाहेर पडताना जी पथ्ये सांगितली जातात ..त्यात समुपदेशकाला नियमित भेटणे ..अल्कोहोलिक्स अँनाँनिमस च्या मिटिंगला जाणे ..वगैरे ज्या सूचना दिल्या जातात त्याचे व्यसनी व त्याचे पालक दोघांकडूनही पालन केले जात नाही .

८) व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले म्हणजे आता याचे व्यसन सुटलेच पाहिजे असा समज अनेक पालकांचा होतो..व काही केसेल मध्ये पुन्हा पिणे सुरु झाल्यास ..आजारा ला जवाबदार न मानता पालक व्यसनमुक्ती केंद्राला दोष देतात ...उपचार घेतलेल्या व्यक्तीवर अवास्तव विश्वास ठेवतात .. पालकांनी पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करू नये म्हणून व्यसनी खूप तक्रारी करतो व्यसनमुक्ती केंद्राबद्दल आणि पालक देखील त्याच्या तक्रारींवर विश्वास ठेवून त्याला पुन्हा उपचार देणे टाळतात .

( बाकी पुढील भागात )

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

वाढत जाणारा आजार !


सर्व प्रकारच्या दुर्धर आजारात हे वैशिष्ट्य आहे की योग्य वेळी लक्षात येवून उपचार झाले नाहीत तर आजार वाढत जातो ..व्यसनाधीनतेचा आजार देखील त्याच प्रकारचा आहे .. हा मनोशारीरिक आजार वाढत जाणारा आजार आहे असे म्हंटले जाते याचा अर्थ असा आहे की सेवन करण्याऱ्या व्यक्तीचे व्यसनाचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत जाते ..पहिल्या वेळी सेवन केल्यावर .... ' मजा आया ' ही भावना तयार होण्यासाठी जितका डोस लागला होता ..त्यापेक्षा जास्त डोस पुढच्या वेळी ' मजा आया ' चा अनुभव घेण्यासाठी लागू शकतो .. नंतर नंतर या डोसचे प्रमाण वाढतच जाते .. केवळ डोसच वाढतो असे नव्हे तर जसे जसे डोस वाढत जातो तसे तसे सेवन करणाऱ्या व्यक्तीचे मानसिक ..शारीरिक .आर्थिक ..कौटुंबिक ..सामाजिक आणि नैतिक पातळीवरील नुकसान देखील वाढत जाते ..प्रत्येक व्यक्तीचा डोस वाढवण्याचा वेग निरनिराळा असू शकतो ..मात्र डोस आणि नुकसान यात वाढ होत जाते हे निखळ सत्य आहे . या वरून या आजाराच्या इतर दुर्धर आजारांप्रमाणे तीन स्टेजेस करता येतील .


१) पहिल्या स्टेज मध्ये ..व्यसनी व्यक्ती नियमित सेवन न करता वर्ष सहा महिन्यातून जे पिण्याचे प्रमाण होते ते पंधरा दिवसातून एकदा किवा आठवड्यातून एकदा करतो .. स्वाभाविक व्यसनावर होणारा त्याचा खर्च वाढतो ..मी रोज घेत नाही असे तो इतरांना आवर्जून सांगत जातो ..पत्नी किवा कुटुंबीयांनी त्याच्या या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली अथवा त्याला उपदेशाचे चार शब्द सांगितले तर तो पार्टी ..जुना मित्र भेटला .. आज जरा जास्त ताण होता अशी विविध कारणे सांगत जातो ..व्यसन केले आहे हे लपवायला खोटे बोलणे... आदळ आपट सुरु करतो .. दारू सोबत कधी कधी झोपेच्या गोळ्या .ताडी ..अथवा गांजा सारखे इतर मादक पदार्थ देखील प्रयोग म्हणून सेवन केले जाऊ शकतात ..घरात किरकोळ खटके उडतात .

२) आठवड्यातून तीन चार वेळा किवा नियमित सेवन केले जाते ..राजरोस पिणे सुरु होते ...चिडचिड वाढते ... व्यसनाच्या वाढत्या प्रमाणाबरोबर .. कामावरील सुट्यांचे प्रमाण वाढते ..कारण रात्री जास्त झाल्याने ..दुसऱ्या दिवशी कामावर जावेसे वाटत नाही ..आळस वाढतो .. दैनंदिन कौटुंबिक जवाबद-या कडे दुर्लक्ष होते .लैंगिक संबंधातील रुची नष्ट होते किवा संबंध ठेवणे जमत नाही ....पूर्वी कुटुंबियांचा उपदेश शांतपणे एकूण घेतला जाई.. आता उलट उत्तरे देणे सुरु होते ....विवाहित असल्यास पत्नीशी आर्थिक व इतर कारणांवरून होणारी भांडणे वाढतात ..कुटुंबीय देखील बाहेरच्या लोकांना उगाच शोभा नको म्हणून नमते घ्यायला सुरवात करतात ..घरातील लोक त्याच्या व्यसनासाठी एकमेकांना जवाबदार धरू लागतात ..किवा घरात दोन गट पडतात ..विवाहित असल्यास एका बाजूला पत्नी असते तर दुसऱ्या बाजूला व्यसनी व त्याचे कुटुंबीय जे व्यसनीच्या पत्नीला सबुरीने घ्यायला सांगतात किवा तिने उगाच कटकट करू नये म्हणून तीला बजावतात ..यात त्यांचा हेतू कितीही चांगला असला तरी व्यसनी व्यक्तीच्या वर्तनाला खतपाणी मिळत जाते ..कमीच मोठा भाग व्यसनावर खर्च होऊ लागतो ..ज्यामुळे घरात पैश्यांची चणचण भासू लागते ..कुटुंबीय कसे तारे सारे निभावून नेवू लागतात ..क्वचित घरात शिवीगाळ ..भांडणे होतात ..पत्नी घर सोडून जाण्याच्या धमक्या देवू लागते ..खाजगी नोकरी असल्यास नोकरी जाऊ शकते .. सरकारी नोकरीत मेमो मिळतात ..रजेचे कारण म्हणून डॉक्टरची खोटी प्रमाणपत्रे कचेरीत दिली जातात ..व्यवसाय डबघाईस येतो ....व्यसनीचे जेवण घटते तर कुटुंबियांना त्याच्या चिंतेने जेवण गोड लागत नाही ..व्यसनी व्यक्ती जास्तीत जास्त एकटा राहू लागतो ..एकलकोंडेपणा वाढतो ..लग्नकार्ये व इतर सामाजिक समारंभात जाणे टाळू लागतो ..कुटुंबियांना देखील शेजाऱ्या पाजा-यांच्या ..नातलगांच्या अवघड प्रश्नांचा सामना करावा लागतो .. अधून मधून व्यसन सोडण्यासाठी शपथ घेतली जाते ..वचने दिली जातात मात्र व्यसनी व्यक्ती योग्य समर्थांना सह शपथा ..वचने मोडू लागतो . घरातील लहान मुले भांबावून जातात .. व्यसनी व्यक्तीला ती घाबरू लागतात ..त्यांच्या आभ्यासावर परिणाम दिसू लागतो .एकदोन किरकोळ अपघात घडू शकतात ..क्वचित पत्त्नीला किवा व्यसनाच्या आड येणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ ..मारझोड सुरु होऊ शकते ..या स्टेज मध्ये कुटुंबीय ..उपास तपास ..नवस -सायास ..अंगारे ..धुपारे पत्रिका ..जोतिषी असे विविध उपाय योजण्याचा प्रयत्न करतात . काही केसेस मध्ये जनरल फिजिशियन कडून औषध उपचार होतात ..काही दिवस बरे जातात ..पुन्हा तेच सुरु होते एव्हाना व्यसनावर उडवलेला किवा व्यसनामुळे खर्च झालेला पैसा लाखोंच्या घरात जातो त्यामुळे परवडेल तशी हलक्या दर्जाची दारू सेवन केली जाते .

३) सकाळ ..संध्याकाळ ..किवा दिवसातून वाटेल त्या वेळा व्यसन केले जाते ..घरात भांडणे रोजची होतात ..शेवटी रोज मरे त्याला कोण रडे अश्या अविर्भावात घरचे स्वतची सहन शक्ती वाढवतात .. व्यसनी आता सरळ सरळ स्वतच्या व्यसनाला इतरांना जवाबदार धरू लागतो ..कुटुंबीयांवर बेछूट आरोप करणे सुरु होते .. अगदी पत्नीच्या चारित्र्यावर देखील संशय व्यक्त करू लागतो ..आपल्या व्यसनाच्या मध्ये कोणी बोलू नये म्हणून तो घरच्या मंडळींच्या मनात दहशत माजवतो ..पत्नी दोन तीन वेळा रागाने माहेरी गेलेली असते ..व्यसनीने पुन्हा तिच्याशी गोड बोलून भूलथापा देवून परत आणलेले असते ..कुटुंबियांची निराशा वाढत जाते .. पत्नीच्या मनात आत्महत्येचे विचार येतात ..परंतु केवळ मुलाकडे पाहून तिचे तसे धाडस होत नाही ..घरात व्यसनी व्यक्ती स्वतचा हिस्सा वाटा आई वडील व भावंडे यांच्याकडे मागू लागतो ..काही ठिकाणी उगाच डोक्याला ताप नको म्हणून व्यसनी व्यक्तीला वेगळे घर करून दिले जाते ..आर्थिक मदत करणे कुटुंबीय बंद करतात किवा नाकारतात व नाईलाजाने मदत करतात . याच काळात ' हा मेला तर एकदाचे सुटू ' असे विचारही त्यांच्या मनात येवू लागतात ...उधार उसनवारी .कर्जे वाढू लागतात . विविध शारीरिक आजार जडू शकतात .. घरच्या गोष्टी चव्हाट्या वर येण्याची कुटुंबियांची भीती हळू हळू नष्ट होऊ शकते ..कसेही करून याला आवर घातला पाहिजे असे वाटून काही कडक मात्र अशास्त्रीय उपाय योजले जाऊ शकतात .

वर वाढत जाणाऱ्या आजाराचे तीन स्टेजेस मध्ये सर्वसाधारण असे वर्णन केले आहे .. काही सन्माननीय अपवाद असू शकतात .. ज्यांच्याकडे या बद्दल योग्य युक्तिवाद असेल ...काही लोक व्यसनाच्या बाबतीत इतके संवेदनशील असतात की त्यांच्या बाबतीत एकदम पहिली आणि तिसरी स्टेज येवू शकते .. तर दारू सोडून इतर मादक पदार्थांच्या बाबतीत अश्या स्टेजेस एकदम वेगाने येतात ..काही केसेस मध्ये व्यसनी वर्ष सहा महिने व्यसन बंद करतो मात्र जेव्हा पुन्हा सुरु होते तेव्हा सगळी भरपाई करून दुप्पट वेगाने पितो व नुकसान देखील वेगाने होते .यातील कोणत्याही स्टेज मध्ये व्यसानीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्यास बरेच नुकसान टळू शकते . 

( बाकी पुढील भागात )

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

शक्तिमान आजार !


या आजाराचे चौथे वैशिष्ट्य म्हणजे हा आजार अतिशय शक्तिमान मानला जातो ..व्यसनी व्यक्तीच्याच सर्व प्रकारच्या शक्तींचा वापर करून हा आजार त्यालाच नेस्तनाबूत करण्याचे काम करतो ..व्यसन बिनदिक्कत करता यावे म्हणून व्यसनी व्यक्ती निकराने लढतो .. आपल्या व्यसनाच्या आड येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली शत्रू आहे आहे असे त्याला प्रामाणिकपणे वाटत असते..अशा काल्पनिक शत्रूंचा बिमोड करण्यासाठी तो झुंजत राहतो ..स्वतच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचे काम तो अतिशय बुद्धीमत्तेने ..चातुर्याने आणि कौशल्याने करतो ..स्वतःचेच नुकसान करून घेतो ..मात्र ते कबुल न करता ..झालेल्या नुकसानाला इतरांना जवाबदार ठरवतो ..कुटुंबीय उगाच कटकट करतात ..माझ्यावर लोक जळतात ..माझे सुख यांना पाहवत नाही वगैरे अविवेकी विचार त्याच्या मनात घर करून असतात .' मी व्यसनाचा गुलाम झालोय ' ही गोष्ट ते प्राणांतिकपणे नाकारतात .किवा जर मान्य केलेच तर उपचार घेणे टाळतात .. अनेक समर्थने अनेक करणे उपचाराच्या आड उभी करतात . स्वतचा घेतलेल्या किवा इतरानी घातलेल्या शपथा ..वचने... ते बेमालूमपणे मोडतात..काही वेळा व्यसनामुळे होत असणा-या त्रासामुळे ते एखाद्या फिजिशियन कडे अथवा मानसोपचार तज्ञाकडे स्वतःहून जातात देखील ..मात्र तेथे नेमके किती व्यसन करतो ते काही खरे सांगत नाहीत ..अथवा डॉक्टरनी सांगितलेली औषधे नीट घेत नाहीत ..आणि सर्वात प्रमुख पथ्य म्हणजे दारू न पिणे किवा व्यसन न करणे हे अजिबात पाळत नाहीत ... औषधे आणि व्यसने दोन्हीही सुरु राहतात . या आजाराच्या शक्तिमान पणाची काही उदाहरणे खाली देत आहे .

१) जेथे जेथे त्यांना उपचारांसाठी दाखल केले जाते ...तेथे तेथे चोरून लपून व्यसन करण्याची त्यांची मनापासून इच्छा असते .. 

२) बहुधा व्यसनी व्यक्ती व्यसनमुक्ती उपचार घेण्यास सहजासहजी तयार होत नाही ..मात्र फक्त दोन तीन दिवस एखाद्या खाजगी इस्पितळात दाखल होण्यास तयार होतो ..याचे कारण तेथून त्याला बाहेर पडणे सोपे असते ..किवा व्यसनामुळे खूप शारीरिक त्रास असूनही खाजगी इस्पितळात तो गुपचूप दारू पितो ..भेटायला येणाऱ्या मित्रांकडून दारू मागवतो ..किवा जवळ पैसे असतील तर वार्डाबॉयला लाच देवून आपला कार्यभाग पूर्ण करतो ..कोणाला समजू नये म्हणून शहाळ्यात ( नारळाचे पाणी )दारू टाकून मित्रांनी आणून दिल्याची उदाहरणे मला माहित आहेत 

३) हॉस्पिटल मधून पळून जाणे ..व्यसनमुक्ती केंद्रातून पळून जाणे .. घरात जरी कोंडून ठवले तर दारे खिडक्या तोडून पळून जाणे ..असे व्यसनीच्या बाबतीत घडू शकते .

४) व्यसनमुक्ती केंद्रात स्वतःहून किवा दबाव टाकून दाखल केल्यावर व्यसनी तेथून बाहेर पडण्याचे निकराचे प्रयत्न करतो .. त्यात कुटुंबीय भेटायला आल्यावर त्यांना खूप तक्रारी सांगणे .. येथून लवकर बाहेर काढा नाहीतर बाहेर पडल्यावर जास्त व्यसन करीन अशा धमक्या देणे ..पत्नीला घटस्फोटाच्या धमक्या देणे ..आणि कसेही करून उपचार अपूर्ण सोडल्याची किवा समुपदेशक सांगतील त्याप्रमाणे न वागता डिस्चार्ज घेल्याची अनेक उदाहरणे मला माहित आहेत .

( बाकी पुढील भागात )

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३

कायमचा आजार ...सिंदबादचा म्हातारा !

व्यसनाधीनता या दुर्धर आजाराचे पुढील आणि शेवटचे वैशिष्ट्य म्हणजे हा आजार कायमचा आहे असे म्हणतात ... म्हणजेच एकदा व्यसनी व्यक्ती त्या व्यसनाचा गुलाम झाला की ही गुलामी कायमची त्याच्या मनात घर करून राहते असे मानले जाते . काही काळ किवा अनेक वर्षे व्यसने करून मग नंतर सगळी व्यसने एका झटक्यात कायमची सोडलेली जशी माणसे आपल्या पहाण्यात किवा ऐकण्यात आहेत त्याच्या दुप्पट संख्येने व्यसन सोडून वारंवार पुन्हा पुन्हा व्यसनाकडे वळल्याची उदाहरणे आहेत . व्यसन बंद केल्यावर देखील व्यसनाने पूर्वी दिलेल्या आनंदाची आठवण वारंवार येत राहणे हा या आजाराचा अपराहार्य भाग आहे ...अनेक पालक या बाबतीत अनभिज्ञ असतात .. व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांसाठी दाखल करून ..उपचार घेवून व्यसनी व्यक्ती व्यसनमुक्ती अवस्थेत बाहेर पडल्यावर ..तो आता कधीच व्यसन करणार नाही असे त्यांची आशा असते ..त्यांना व्यसनमुक्ती केंद्रातील समुपदेशकांनी किती जरी सूचना दिलेल्या असल्या काळजी घेण्याच्या ....पाठ पुरावा करण्याच्या ...तरी प्रत्यक्ष व्यसनी व्यक्ती आणि त्याचे पालक या बाबतीत गंभीर असत नाहीत .. उपचारानंतर योग्य पाठपुरावा न केल्याने अथवा हा आजार नेमका किती भयावह आहे हे नीट समजून न घेतल्याने ... या आजारात रीलँप्स होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे ...एकदा व्यसन बंद केल्यावर आता व्यसनाची आठवण किवा इच्छा अजिबात होणारच नाही असे नाही ..कारण व्यसनाच्या सुरवातीच्या काळात व्यसनाने दिलेला आनंद नंतर उद्भवणाऱ्या समस्यांमुळे तात्पुरता जरी विसरल्या सारखा झाला ..किवा ' आता नको रे बाबा ' ..' कान पकडले '... ' छे ...छे ..आता अजिबात नाही ' असे वाटले तरी ते पुढे प्रामाणिक पणे पाळणे अत्यंत कठीण असते .

एखादी इच्छा न होण्याचे औषध बाजारात उपलब्ध नाही..वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा मानवी मनात नेहमीच येत असतात ..मात्र सर्व सामान्य माणसे एखादी इच्छा आणि त्या इच्छा पुर्तीमागील फायदा व नुकसानाचा मनातल्या मनात आढावा घेवून ती विशिष्ट इच्छा पूर्ण केल्याने आपले नुकसान होणार आहे असे आढळले तर ..स्वतच्या आणि कुटुंबियांच्या भल्याचा विचार पुढे ठेवून ती इच्छा सोडून देतात ...म्हणजेच त्या व्यक्तीला स्वतच्या इच्छेचा त्याग करावा लागतो ..... वव्यसन बंद असतानाही व्यसनी व्यक्तीच्या मनात सुप्त अवस्थेत ...पुन्हा फक्त एकदा ..कधीतरी ...लिमिट मध्ये ..व्यसन करण्याची इच्छा दडलेली राहते .. वरकरणी जरी तो सर्वसाधारण वर्तन करीत राहिला तरी ..एखाद्या प्रसंगाने ...भावनिक अस्वस्थते मुळे.. एखादे संकट ..समस्या या निमित्ताने ती इच्छा पुन्हा व्यसनी व्यक्तीच्या मनाचा ताबा घेते ..आणि त्या वेळी व्यसनी व्यक्तीने योग्य मदत न घेतल्यास ..पुन्हा व्यसन करण्याची शक्यता वाढते ..नंतर पुन्हा एकदा जरी व्यसन केले तरी ..व्यसनी व्यक्तीचे शरीर पुन्हा जागृत होते .. एखाद्या सुप्त ज्वालामुखी प्रमाणे स्वस्थ असलेल्या शरीरात त्या व्यसनाचा थोडा जरी डोस गेला तरी ते शरीर बंड करून उठते ..आणखी हवे ..अजून पाहिजे .. मागणी करू लागते व व्यसनी व्यक्ती पुन्हा नकळत पूर्वीच्याच वाटेवर ओढला जातो ...आजाराच्या या स्वरूपाला ' ' मेंटल ओब्सेशन ' व नंतर ' फिजिकल अँलर्जी ' असे संबोधले जाते ..म्हणजेच मेंटल ओब्सेशन मुळे एकदा तरी पुन्हा घेण्याची इच्छा आणि फिजिकल अलर्जी मुळे एकदा जरी घेतले तरी शरीर वारंवार घेण्याची मागणी करणार ..अशी कात्रीत सापडल्या सारखी अवस्था येते . अश्या वेळी जर ताबडतोब सावधगिरीची पावले उचलली नाहीत तर ..पुन्हा तोच प्रवास सुरू होतो . 

हे म्हणजे लहानपणी ऐकलेल्या सिंदबादच्या म्हाताऱ्याच्या गोष्टी सारखे आहे ..एकदा तो म्हातारा मानगुटीवर बसला की तो काही केल्या उतरण्याचे नाव घेत नाही ..अगदी जीवाच्या आकांताने ...निकराने ..प्राणांतिक प्रयत्नाने त्या म्हाताऱ्याला मानगूटीवरून फेकून द्यावे लागते ..शिवाय पुढचा भाग असा कीतो म्हातारा जरी खाली फेकून दिला ..तरी तो पुन्हा ...तुम्हाला आता या पुढे त्रास देणार नाही ...असे कळवळून म्हणत करून पुन्हा खांद्यावर घेण्याची विंनती करत राहतो ...त्यासाठी व्यसनी व्यक्तीने जरी व्यसन बंद केले तरी व्यसनामुळे झालेला त्रास कधीच विसरता कामा नये ..' मजा आया ' ही मेंदूत तयार झालेली फाईल पूर्णपणे डिलीट करण्यासाठी ' सजा मिला ' या नावाची व्यसनाने दिलेल्या त्रासांची फाईल मेंदूत तयार करून ..ती सतत अपडेट करत राहावी लागते . तेव्हाच जुनी फाईल निष्प्रभ होत जाते .

( बाकी पुढील भागात )

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

आधी कोंबडी की अंडे ?

एखादी व्यक्ती व्यसनी होण्यामागे त्या व्यक्तीच्या स्वभावातील काही भाग जवाबदार असू शकतो .. असे संशोधन आहे ..तसेच वारंवार व्यसन केल्यामुळे व्यक्तीच्या स्वभावात काही बदल होत जातात .. त्यांना स्वभावदोष म्हणता येईल ..म्हणजेच विशिष्ट स्वभावाच्या व्यक्तीच त्यांच्या आयुष्यात कोणत्याही कारणांनी व्यसन आल्यास ..व्यसनी होऊ शकतात असे म्हणतात .. या आजाराच्या मागे उल्लेख केलेल्या विशिष्ट लक्षणांमुळे व्यसनी व्यक्तीच्या व्यक्तीमत्वात ..स्वभावात .. वर्तनात ..काही बदल होणे अपराहार्य असते . एकदा आजार खोलवर रुजला की ..व्यसनामुळे मिळणाऱ्या तात्पुरत्या आनंदाची व्यसनी व्यक्तीला इतकी प्रचंड ओढ असते की ..त्यापुढे जगातील इतर सर्व आनंद त्याला तुच्छ वाटू शकतात .. तसेच हळू हळू त्याची मनस्थिती ..एकलकोंडेपणाची ..निराशेची ..वैफल्याची ..इतरांना दुषणे लावण्याची ..बनत जाते . म्हणून या आजारात त्या व्यसनी व्यक्तीच्या वागण्याला ..दोष न देता .. त्याला वारंवार त्याचा आजार समजावून सांगणे ...त्यासाठी त्याने स्वतच्या विचारात ..वर्तनात ...म्हणजेच स्वभावात कसे बदल केले पाहीजेत हे संयमाने समजावले पाहिजे ..तसेच त्या पहिल्या घातक नशेच्या डोस पासून परावृत्त करण्याचे काम सातत्याने करत रहावे लागते ..व्यसन केल्यामुळे ..व्यसन मिळवण्यासाठी केलेल्या तडजोडींमुळे .. व्यसनाच्या समर्थनामुळे त्याच्या स्वभावात काही बदल होत जातात ज्यामुळे सुधारणा कठीण होत जाते ..अथवा काही केसेल मध्ये व्यसनी व्यक्तीच्या स्वभावात आधीपासूनच काही भाग असा असा असतो की ज्यामुळे तो व्यसनी बनतो . म्हणून व्यसनी व्यक्तीने स्वतच्या विचारात ..वर्तनात अमुलाग्र बदल केल्याशिवाय ..व्यसन मुक्ती दीर्घकाळ टिकवणे त्याला जमत नाही .व्यसनी व्यक्तींच्या स्वभावाबाबत काही निरीक्षणे खाली देत आहे .

१) प्रत्येक व्यसनी व्यक्ती हा प्रचंड अहंकारी असतो ..अनेकदा त्याच्या वर्तनात तो अहंकार स्पष्ट आढळला नाही तरी त्याच्या मनात सुप्त अवस्थेत हा अहंकार दडलेला आशु शकतो ...स्वतच्या बुद्धीमत्तेबाबत ..आर्थिक स्थितीबाबत .. सांपत्तिक स्थिती बाबत ..रंग रूपाबाबत .. अगदी काही वेळा जाती धर्माबाबत देखील हा अहंकार आढळतो . त्यामुळेच आपण केव्हाही व्यसन सोडू शकतो किंवा व्यसनामुळे आपले काही नुकसान होणार नाही ही भावना त्याच्या मनात निर्माण होत असते स्वतःला तो इतरांपेक्षा वेगळा समजतो ..व्यसनंमुक्ती साठी मदत घेण्याच्या बाबतीत देखील हा अहंकार आडवा येतो. 

२) बहुधा प्रत्येक व्यसनी हा अतिशय हट्टी व जिद्दी स्वभावाचा असतो ..म्हणूनच आपले काही चुकते आहे हे मान्य करणे त्याला कठीण जाते ....तसेच त्याचा आयुष्यात असलेल्या समस्या .. संकटे .. अडचणी ..सोडवण्यासाठी तो स्वतच्याच मर्जीने वागण्याचा प्रयत्न करतो ..इतरांच्या सूचना सल्ले मनात नाही ...आपण व्यसनी झालो आहोत व आपल्याला स्वतच्या विचारात बदल केल्याशिवाय व्यसनमुक्ती टिकवणे कठीण आहे हे स्वीकार करून स्वतःमध्ये बदल करणे त्याला कठीण जाते .

३) हळू हळू व्यसनी व्यक्ती आत्मकेंद्रित बनत जातो ... त् आपल्या व्यसनामुळे इतरांना होणाऱ्या त्रासाची त्याला पर्वा रहात नाही ..केवळ माझा आनंद ..माझी मजा ..माझी आवड .. याच विचारात तो मशगुल असतो .... काही वेळा त्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप देखील होतो ..मात्र तो पश्चाताप फार काळ टिकत नाही .

४) खोटे बोलण्यात तो पटाईत असतो .. स्वतचे व्यसन लपवण्यासाठी .. केलेल्या भानगडी निस्तरण्यासाठी अनेकदा खोटे बोलावे लागल्यामुळे पुढे पुढे त्याला खोटे बोलण्याची सवयच लागू शकते ..त्यामुळे त्याच्या मनात नेमके काय दडलेय हे ओळखणे कठीण होऊन बसते .

५) आधीपासूनच अतिशय चंचल स्वभाव असतो ..किवा नंतर व्यसनामुळे स्वभाव चंचल बनतो ..त्यामुळे व्यसनमुक्ती टिकवण्यास लागणारे सातत्य ..सुधारणे साठी लागणारी एकाग्रता .. उपचार घेताना आवश्यक असणारी मनोभूमिका त्याला फार काळ टिकवता येत नाही .

६) आत्ममग्न स्वभाव ( इंट्रोव्हर्त व्यक्तिमत्व )..एरवी तो कितीही बोलका ..बडबड्या वाटला तरी मनातील नेमक्या गोष्टी तो कोणाजवळ बोलणे कठीण असते ..अनेकदा स्वतच्या समस्यांनबाबत उघड चर्चा करणे त्याला आवडत नाही ...किवा मदत मागणे देखील त्याला आवडता नाही ..त्यामुळे समजून घेण्यास कठीण असे व्यक्तिमत्व असते .
७) कुशाग्र बुद्धिमत्ता असली तरी भावनिक दृष्ट्या तो अतिशय कमकुवत असतो .. त्यामुळे भावना आणि व्यवहार या मध्ये योग्य सांगड घालता येणे त्याला जमत नाही .तो बहुधा भावनेला प्राधान्य देतो ..त्यामुळे अनेक निर्णय तो भावनेच्या आहारी जावून घेतो .. व ते हमखास चुकतात ...त्याबद्दल स्वतची चूक ना मानता तो इतरांना दोष देतो .

८) बाहेरच्या किवा अल्प परिचय असणाऱ्या लोकांशी तो अतिशय गोड संभाषण करतो ..किवा त्यांना त्याच्या स्वभावात काही वावगे आढळत नाही ..खोट्या नम्रतेने वागण्यात हुशार असतो .. मात्र घरच्या लोकांशी त्याला गोड बोलणे जमत नाही .. घरात त्याची प्रचड दशहत असते .

या वरून काही म्हणी केवळ व्यसनी व्यक्तीवरूनच बनल्या आहेत असे वाटते ..उदा.

१) दुरून डोंगर साजरे 
२) धरले तर चावते सोडले तर पळते 
३) आपलेच दात आपलेच ओठ 
४) मुह मे राम ..बगल मे छुरी
५) हम करेसो कायदा .
६) सहन होत नाही आणि सांगता येत नाही 
७) घरात नाही दाणा..मला बाजीराव म्हणा 
८) गर्जेल तो पडेल काय 
९ ) बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात
१०) गिरे तो भी टांग उप्पर 

( बाकी पुढील भागात )

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१३

व्यसनाधीनते वरील विविध उपचार !

मागील सर्व भागात आपण व्यसनाधीनता या आजाराच्या विविध पैलूबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे ..त्यावरून व्यसनाधीनता हा मनो -शारीरिक आजार किती गंभीर आहे हे लक्षात येते . जगात अनेक शारीरिक तसेच मानसिक आजार आपण ऐकून आहोत ..बहुधा एखादी शारीरिक व्याधी अथवा दुखणे उद्भवले तर लोक लगेच ..त्या त्रासाबद्दल घरात सांगतात ..मग स्वतहून डॉक्टर कडे जायला तयार होतात .. डॉक्टरकडे गेल्यावर ..डॉक्टर जे काही विचारेल ती सर्व खरीखुरी माहिती सांगतात ..इतकेच नव्हे तर डॉक्टर जे उपाय सुचवतील किवा जी औषधे लिहून देतील ती प्रामाणिक पणे घेतात ..ती व्याधी बरी व्हावी म्हणून शक्य होईल तितका पैसा खर्च करतात ..वेळप्रसंगी उधार ..उसनवार करून .कर्जे काढून कसेही करून उपचार घेतात . ..जर एका डॉक्टर कडे जाऊन बरे वाटले नाही तर दुसऱ्या डॉक्टरकडे जातात . आजारी व्यक्तीचे नातलग देखील वारंवार आजारी माणसाची विचारपूस करतात ..त्याच्यासाठी पैसा खर्च करण्यास तयार असतात .
हे झाले सर्व साधारण शारीरिक आजारांबाबत ..मात्र मानसिक आजारात बहुधा उलटे घडते .. मानसिक व्याधी जडलेल्या व्यक्तीला आपल्या मानसिकतेत काही बदल झाले आहेत व त्याचा परिणाम आपल्या वर्तनावर होतो आहे हे मान्य नसते ..खूप कमी लोक असे आहेत की जे स्वतःहून मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेण्याची तयारी दर्शवतात ..बहुतेक लोकांना त्यांचे नातेवाईक मागे लागले म्हणून मानसोपचार तज्ञांकडे जावे लागते ..अशाही केसेस मला माहित आहेत की जेथे एखाद्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले आहे ..ती व्यक्ती ते मान्य करण्याएवजी उलट माझे काही चुकत नाहीय असा दावा करून कुटुंबियांशी भांडण करते ..त्यांचा सल्ला ऐकत नाही ..शेवटी कुटुंबीय वैतागून मानसोपचार तज्ञाकडे जाऊन ..पेशंट यायला तयार नाहीय अशी विनंती करून ..तुम्ही त्याला प्रत्यक्ष न भेटताच आम्ही सांगतो त्या लक्षणांवरून औषधे लिहून द्या अशी गळ घालतात .. पेशंटला नकळत ती औषधे देण्याचा प्रयत्न करतात . म्हणजेच शारीरिक आजारात जरी व्यक्ती स्वतःहून डॉक्टरकडे जायला तयार असला ..तरी बहुधा मानसिक आजारात तसे दिसत नाही ...कारण आपल्याकडे अजूनही मानसिक विकार या बाबीकडे एकदम वेडा या अर्थानेच पहिले जाते .म्हणजे मानसिक असंतुलनाच्या एकदम अंतिम अवस्थेशी तुलना केली जाऊन .. मी कुठे कपडे काढून फिरत नाही ..लोकांना दगडे मारत नाही ..रस्त्याने हातवारे कारत चालत नाही ..किंवा हवेत बडबड करून शिवीगाळ करत नाही ..मग मला मानसोपचारांची काय गरज असे त्याचे म्हणणे असते . खरेतर निरोगी शरीरचे जितके महत्व जीवनात आहे तितकेच महत्व निरोगी मनाचे देखील आहे ..माणसाच्या मनात येणाऱ्या विविध प्रकारच्या सकारात्मक अथवा नकारात्मक भावना.. व्यक्तीला त्याप्रमाणे वर्तन करायला भाग पाडत असतात .. आपले वर्तन जर स्वतच्या आणि इतरांच्याही विकासाच्या आड येत असेल .. आपले कुटुंबीय ..आपले नातलग किवा जवळचे मित्र तसे सुचवीत असतील तर नक्कीच मानसोपचार तज्ञांची भेट घेतली पाहिजे ही मानसिकता अजून आपल्या देशात फारशी विकसित झालेली नाही ..किवा त्याबाबत अजूनही हवी तितकी जागरूकता झालेली नाही हेच खरे .

व्यसनाधीनता हा मनो - शारिरीक आजार मानल्या गेल्यामुळे .. या आजारात प्रथम मनाचा भाग क्षतिग्रस्त होत जातो व नंतर वारंवार व्यसन करत गेल्याने शारीरिक हानी होत जाते .. बहुधा व्यसनाधीनता या आजारात देखील इतर मानसिक आजारांप्रमाणेच ..नकाराची किवा मला काही झालेले नाही ही व्यसनी व्यक्तीची विचारसरणी झालेली असते ..फक्त खूप मोठे शारीरिक त्रास उदभवतात तेव्हा तो एखाद्या डॉक्टरकडे जावून शारीरिक त्रास बंद करण्यासाठी औषध मागतो किवा डॉक्टरच्या सल्ल्यावरून काही दिवस दवाखान्यात उपचार घेण्यास तयार होतो ..कायमचे व्यसनमुक्त व्हावे म्हणून तो स्वतःहून प्रयत्नशील असणे कठीणच असते ...असे अनेक लोक आहेत की जे खूप शारीरिक त्रास होतात म्हणून डॉक्टर कडे जावून काही दिवस अँडमिट होतात .. अँडमीट असतानाही ते शक्य झाल्यास दवाखान्यातच आपले व्यसन मिळविण्याचा प्रयत्न करतात..अथवा दवाखान्यात आपल्याला व्यसनामुळे दाखल व्हावे लागले आहे हे त्यांच्या गावीही नसते किवा मान्य नसते ..असे लोक बाहेर पडताच पुन्हा नव्या जोमाने व्यसन सुरु करतात .त्यामुळे व्यसनी व्यक्तीला फक्त शारीरिक उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करून काम संपत नाही ..तर त्याला मानसोपचारांची देखिल गरज आहे हे फार थोड्या नातलगाना उमगते ....तरी गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आता मानसिक आजारांबद्दल बरीच जागृती झालेली आहे ..

( बाकी पुढील भागात )

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

गंडे ..दोरे ...अंगठ्या ..मंत्र ..तंत्र !


एकदा व्यसनाधीनता या आजाराच्या विनाशाला सुरवात झाली की ..कधी कधी घेतो ..आजकाल सगळेच घेतात ..असे म्हणणारे कुटुंबीय सावध होतात .. व्यसनी व्यक्तीचे दिवसेंदिवस होत जाणारे नुकसान पाहून ..सर्वात आधी घराची पहिली स्त्री म्हणजे पत्नी किवा व्यासनीची आई असेल ती ..मनातल्या मनात एखाद्या देवाला नवस करते .. एखादा कडक उपास करते ..तिला भाबडीला उगाचच वाटते की घरात काही तरी देवधर्म केला तर नक्की याच्यावर देवाची कृपा होऊन याला चांगली बुद्धी मिळेल व याचे व्यसन थांबेल ..त्याचाही परिणाम होत नाही म्हंटल्यावर एखाद्या देवाच्या नावाने किवा एखाद्या बाबाने मंत्रवून दिलेला गंडा अथवा काळा दोरा व्यसनीच्या गळ्यात ..मनगटावर ..दंडाला बांधला जावू शकतो किवा एखाद्या पवित्र धार्मिक स्थळाचा अंगारा टाकून ताईत बनवून दिला जातो .. पुढची पायरी असते ती जोतीष्याची .. कुटुंबियांच्या ग्रहांवरील संशयाला जोतिषी पुष्टी देतो ....आकाशातील ग्रह तारे आपापल्या गतीने नियमित भ्रमण करत असतात त्यापैकी एखादा उपद्रवी ग्रह याच्या पत्रिकेत ठाण मांडून बसला असावा असा निष्कर्ष काढतो ..या बाबतीत राहू.. केतू . शनी हे बदनाम आहेतच ..दशा ..महादशेचा शोध घेतला जातो आणि एखाद्या ग्रहाची अंगठी व्यसनीला घालायला सांगितली जाते ..किवा ग्रहाची शांती वगैरे करण्याचे उपाय सुचवले जातात ..


काही वेळा .त्रिपिंडी ..कालसर्पयोग ..नारायण नागबळी नावाचा विधी करायला सांगितला जातो ..हा विधी फक्त त्र्यंबकेश्वर येथेच होतो ..अनेक लोक हा विधी करतात .. माझ्या एकदोन मित्रांना त्यांच्या कुटुंबीयांनी नेले होते त्र्यंबकेश्वरला .. तिथे तीन दिवसांचा विधी करावा लागला ..कडक नियम असतात ..मुख्य म्हणजे या तीन दिवसात पूजा करणार्यांनी कोणतेही व्यसन करता कामा नये असा दंडक आहे ..मात्र माझे मित्र गुपचूप सर्वांचा डोळा चुकुवून रोज रात्री व्यसन करत गेले ..म्हणजे विधी देखील नीट झाला नाही ..तर काही तीन दिवस कसेतरी कळ काढतात .. आणि नंतर लगेच चौथ्या दिवशी व्यसन करतात ..वाट पाहतात की आता हा धार्मिक विधी केलाय त्याच्या कृपेने आपोआप व्यसन सुटेल . धार्मिकतेच्या या सर्व गोष्टी कुटुंबीय अतिशय भक्तिभावाने करतात ..मात्र ज्याच्यासाठी हे सगळे चालले असेल तो मात्र अगदी तटस्थ असतो ..त्याचा योग्य असा सहभाग नसतोच ..त्यामुळे या विधींचा फायदा होत नाही ..जर व्यसनी व्यक्तीची एखाद्या देवावर ....धर्मावर ..खरी श्रद्धा असेल तर तो कदाचित या श्रद्धेमुळे व्यसनातून बाहेर पडू शकतो ..मात्र खरी श्रद्धा न ठेवता अर्धश्रद्धा किवा अंधश्रद्धा उपयोगी ठरत नाही ..एखाद्याच्या सांगण्यावरून पंढरपूरला वारीला जावून गळ्यात तुळशीची माळ घालून व्यसन कायमचे बंद केलेली उदाहरणे मला माहित आहेत .. अगदी चमत्कार झाल्यासारखे वाटते हे ..पण त्यामागे खेळ असतो श्रद्धेचा .. अशीही उदाहरणे माहित आहेत ज्यांनी तुळशीची माळ तर घातलीय ..पण व्यसनाची ओढ इतकी जबरदस्त असते की ते लोक प्यायच्या वेळी माळ तात्पुरती बाजूला काढून ठेवतात .. 

जर कुटुंबीय विज्ञानवादी असतील तर ते आधी घरातील किवा नातलगामधील .. मोठ्या माननीय ..आदरणीय व्यक्तीला व्यसनी व्यक्तीला समजावून सांगायला लावतात .. काही काळ व्यसनी त्या व्यक्तीचा मान ठेवून लपून छपून व्यसन करतो ..नंतर नंतर तो अश्या आदरणीय व्यक्तीला टाळू लागतो .. नम्रपणे मान हलवत एका कानाने ऐकतो व लगेच दुसऱ्या कानाने सोडूनही देतो ....त्याला एखाद्या फँमिली फिजिशियन कडे नेले जाऊ शकते .. काहीदिवस दवाखान्यात दाखल केले जाते किवा औषधे दिली जातात ..याचाही परिणाम फार काळ टिकतच नाही ..वेगवेगळ्या कारणांनी यथावकाश व्यसन सुरूच राहते ..मग वर्तमान पत्रात येणाऱ्या व्यसनमुक्तीच्या विविध जाहिरातीकडे कुटुंबियांचे लक्ष जाते .. ' व्यसनीला न सांगता त्याची दारू सोडवा ' ही एक अतिशय आकर्षक जाहिरात आहे ..त्या नुसार त्या विशिष्ट व्यक्तीकडून पैसे देवून गोळ्या किवा एखादी पावडर आणली जाते ..ते औषध व्यासानीच्या जेवणातून किवा त्याच्या चहातून दिले जाते ..हे औषध म्हणजे डायसल्फीरीयम नावाच्या केमिकल पासून बनवलेले असते .. या केमिकलचा आणि अल्कोहोलचा ३६ चा आकडा मानला जातो ..म्हणजे जर हि गोळी पोटात असेल आणि त्या चोवीस तासात व्यसनीने दारूचे म्हणजेच अल्कोहोलचे सेवन केले तर त्याला प्रचंड त्रास होतो ..उलट्या होतात ..जिव घाबरतो ..रक्तदाब वाढतो ..व्यसनी घामाघूम होतो ..अगदी आपण मारतो की काय अशी त्याला भीती वाटते काही वेळ ..तर या भीतीने तो व्यसन बंद करेल अशी आशा असते ..

काही तुरळक आणि भाबडे लोक या मुळे तात्पुरते व्यसन बंद करतात ..ही गोळी व्यसन बंद असतानाही नियमित दिली गेली तर पुन्हा काही दिवसांनी तो जेव्हा व्यसन करायला जातो तेव्हा पुन्हा उलट्या ..त्रास ..मग घाबरून तो व्यसन कायमचा सोडण्याची शक्यता असते ..आणि जर त्याला समजले की घरची मंडळी जेवणातून काही औषध देत आहेत ..तर तो घरात जेवणे बंद करतो ..किवा जर एखादा हट्टी ..जिद्दी व्यसनी ती गोळी पोटात असताना ..प्रचंड त्रास सहन करतही व्यसन करत गेला तर .. हळू हळू त्या गोळीचा प्रभाव नष्ट होत जातो उलट्या होण्याचे प्रमाण घटत जाते व दारू आणि ती गोळी दोन्हीही पोटात सुखनैव नांदतात . आमच्या व्यसनी मित्रांनी तर यावरही उपाय शोधून काढला आहे ..त्या गोळी वर जर म्हणे आंबट खाल्ले तर गोळीचा प्रभाव होत नाही ..म्हणजेच सगळे मुसळ केरात ..नाशिकला हीच गोळी शरीरात बसविण्याची शस्त्रक्रिया एक महिला डॉक्टर करतात ..रोज आठवणीने गोळी देण्यापेक्षा ही शस्त्रक्रिया बरी वाटते ..सुमारे ७० ००० ते एक लाख रुपये खर्च येतो म्हणे या शस्त्रक्रियेचा ..मात्र पुन्हा तिथेही तोच नियम लागू ..न घाबरता व्यसन करत गेले तर शस्त्रक्रिया शून्य ..किवा आंबट खाल्ले तर येरे माझ्या मागल्या . या गोळीचा एक दुष्परिणाम मात्र होऊ शकतो ..एखाद्या जास्त अशक्त असलेल्या ..रक्तदाब ..हृदयविकार असलेल्या व्यसनीने ही गोळी घेतल्यावर दारू सेवन केली तर त्याच्या जीवावरही बेतू शकते ..तेव्हा असे उपचार तज्ञांच्या देखरेखी खाली केलेले बरे . मुख्य म्हणजे हे औषध फक्त अल्कोहोल बाबतच उपयुक्त ठरू शकते .. इतर मादक पदार्थांना हे लागू होत नाही .

( बाकी पुढील भागात )

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१३

संमोहन तज्ञांची मदत ????


उपास ..गंडे ..दोरे ..मंत्र या अशास्त्रीय उपचारांचा व्यसनी व्यक्तीला अगदी अल्प प्रमाणात फायदा होऊ शकतो हे अमान्य करता येणार नाही ....बहुसंख्य व्यसनी या सर्व उपचारांना पुरून उरतात .. त्यांचे व्यसन जोमाने सुरूच राहते ..खरे तर कोणताही व्यसनी भविष्यात आपण एक नावाजलेला व्यसनी व्हायचे हे ठरवून व्यसनी होत नसतो ..दुर्दैवाने स्वतच्या जीवनातील ताण ..निराशा ..वैफल्य .. इतर भावनिक असंतुलनावर त्याने कधीतरी ..थोडीसे .. वगैरे विचार करत जवळ केलेला व्यसनाचा पर्याय नंतर त्याच्या जीवनातील मोठी समस्या बनते ..हा मनो -शारीरिक आजार त्याचे अवघे जीवनच व्यापून टाकतो म्हणजेच सुरवातीचे औषधच नंतर रोग बनते असे म्हणता येईल .. संमोहना द्वारे व्यसनमुक्ती ही जाहिरात देखील वर्तमान पत्रात येत असते ..संमोहन हे एक शास्त्र आहे यात आता दुमत रहिलेले नाही ...अंतर्मनाच्या अगाध शक्तीचा वापर करून विचार आणि वर्तनात बदल करता येवू शकतो हे या शास्त्राने सिद्ध झालेले आहे .. व्यसनी माणसाच्या बाबतीत त्याच्या अंतर्मनाला संमोहित अवस्थेत जर .....विशिष्ट व्यसन तुझा शत्रू आहे ..तुझे व्यसन सुटणार आहे ..तुला व्यसनाची आठवण येणार नाही ..तुझ्या मनावरची व्यसनाची पकड नष्ट होत जाणार आहे... वगैरे प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या तर त्याचा परिणाम होऊ शकतो ..मात्र इथे समस्या अशी येते की संमोहित होण्यासाठी ..संमोहित होणाऱ्या व्यक्तीचे पूर्ण सहकार्य संमोहनकर्त्याला असले तरच व्यक्ती संमोहित होते ....मी व्यसनी झालो आहे ..आयुष्यात पुन्हा कधीच मी व्यसन करता कामा नये हे व्यसनी व्यक्तीने मान्य केलेले असले तरच तो सहजपणे सहकार्य करेल परंतु बहुधा व्यसनी व्यक्तींना व्यसन कायमचे सोडायचे नसते तर फक्त व्यसनाचे प्रमाण आणि होणारे नुकसान यात सुधारणा हवी असते ..अधूनमधून करण्यास काही हरकत नाही हे त्याच्या अंतर्मनात खोलवर ठसलेले असते .. ..शिवाय व्यसनामुळे व्यसनी व्यक्तीचे मन अतिशय चंचल झालेले असल्याने संमोहित होण्याच्या प्रक्रियेत लागणारी एकाग्रता व्यसानीकडे असणे शक्य नसते ..त्यामुळे तो नीट संमोहित होत नाही ..कधी कधी तो संमोहित झाल्याचे नाटक करू शकतो ..संमोहनाबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे त्याच्या मनात आपण संमोहित झाल्यावर संमोहित करणारी व्यक्ती आपल्याकडून आपली रहस्ये काढेल की काय अशी सुप्त भीतीही मनात दडलेली असते ..या सर्वांचा परिपाक असा होतो की व्यसनी नीट संमोहित होत नाही व त्याला संमोहनाद्वारे व्यसनमुक्ती साध्य करणे कठीण जाते .. या साठी दिला जाणारा आवश्यक वेळ ..वेळो वेळी मिळालेले सहकार्य यावरच पुढचे निष्कर्ष अवलंबून असतात ..या बाबतीत अजून संशोधन होणे गरजेचे आहे .

व्यासायिक सामुदेशकाची अथवा मानसोपचार तज्ञांची मदत हा एक मार्ग असू शकतो ..ज्यात व्यसनी व्यक्तीला समुपदेशन करून त्याच्या मनात व्यसनमुक्तीची प्रेरणा बळकट करणे ..ती प्रेरणा आमलात आणण्यासाठी व्यसनी व्यक्तीचे मनोधैर्य वाढवणे .. त्याच्या भावनिक समस्यांवर व्यसन हा उपाय नाही हे त्याला पटवून देणे वगैरे गोष्टी समुपदेशक करू शकतो .अर्थात इथेही व्यसनी व्यक्तीने आवश्यक सहकार्य आणि वेळ देणे अपेक्षित असते ..शिवाय हे सगळे व्यसन न केलेल्या अवस्थेत होत गेले तरच पुढे सरकते .. परंतु व्यसनी व्यक्ती एकदा व्यसनी झाल्यावर त्याचा जास्तीत जास्त वेळ व्यसनात जातो किवा व्यसन करण्यासाठी भानगडी करण्यात ..त्या निस्तरण्यात तो अधिक मग्न असतो त्यामुळे असे सहकार्य बहुधा देत नाही ...मानसोपचार तज्ञांकडे नेल्यास तो बहुधा व्यसनामुळे होत असलेले नुकसान कबुल करत नाही .. तरीही हुशार मानसोपचार तज्ञ सगळे पालक व नातलग यांच्याकडून जाणून घेवून त्याच्या भावनिक संतुलनासाठी किवा व्यसन केले नाही तर होणाऱ्या त्रासांसाठी औषधे लिहून देतात ..जर मानसोपचार तज्ञांचे व्यसनी व्यक्तीशी ट्युनिंग चांगले जमले तर व्यसनी व्यक्ती काही काळ व्यसन बंदही करतो ..पुढे व्यसनी व्यक्ती अजिबात व्यसन न करता सातत्याने मानसोपचार तज्ञांची मदत मनापासून घेत राहिला तर व्यसनमुक्ती शक्य होते ..मात्र पुन्हा सातत्य ही समस्या आड येते ..काही दिवस व्यसन बंद झाले की आता आपले व्यसन कायमचे सुटले या भ्रमात राहून तो आता मानसोपचार तज्ञांकडे जाण्याची गरज नाहीय हे स्वतच ठरवतो ..औषधे घेणे स्वतच्या मनानेच बंद करतो .,,किवा औषध सुरूच आहे तर मग कधी काळी ..थोडे बहुत घेतल्यास हरकत नाही ..असा विचार करून व्यसन करतो व तोवर घेतलेल्या औषधांचा परिणाम शून्य होतो .. किवा काही केसेस मध्ये व्यसन आणि मानसोपचार तज्ञांची औषधे असे दोन्ही सुरु होते ..त्याचे परिणाम अधिक गंभीर असू शकतात . 

( बाकी पुढील भागात )

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

अनामिक मद्यपी ? ? ?


अल्कोहोलिक्स अँनॉनिमस ( अनामिक मद्यपी ) नावाची एक जागतिक पातळीवर सेवाभावी काम करणारी संस्था असून नाशमुक्ती किवा मद्यमुक्ती साठी व्यसनी व्यक्तींना प्रेरणा ..बळ..सातत्य ...देण्याचे काम करते . या संस्थेची सुरवातच अतिशय चमत्कारी पद्धतीने झालेली आहे ..बिल डब्ल्यू व डॉ . बॉब या दोन दारुड्या व्यक्तींनीच या संघटनेची स्थापना केलीय ..बिल डब्लू हा पूर्वी सैन्यात असणारा ...शेअर ब्रोकिंगचे काम केलेला ..इतर अनेक प्रकारचे व्यवसाय केलेला असा दारुडा होता ..स्वतच्या दारूच्या व्यसनामुळे जीवनात वारंवार अनेक चढ उतार त्याने अनुभवले ..अनेक वेळा व्यसनमुक्तीसाठी खाजगी इस्पितळात उपचार घेतले ..मात्र तेथून बाहेर पडताच कालांतराने त्याचे व्यसन पुन्हा पुन्हा सुरु होत असे ..आपली व्यसन सोडण्याची इच्छा असूनही आपल्या बाबतीत वारंवार असे का घडते ? ..मनात उद्भवणाऱ्या व्यसनाच्या आकर्षणाला आपण लगाम का घालू शकत नाही ? वगैरे अनेक प्रकारचे विचार नेहमी त्याच्या मनात असत ..डॉ .बॉब हे एक नामांकित सर्जन ..मात्र ते देखील बिल सारखेच दारुडे ..या दोघांच्या पहिल्या भेटीत त्यांना असा अनुभव येतो की ..त्या भेटीत बिल हा डॉ . बॉबला आपले अध:पतनाचे अनुभव सांगत असतो ..बॉब एकाग्रतेने ते अनुभव ऐकत असतात ..बराच वेळ जातो या भेटीत तरीही दोघांपैकी एकालाही ..समोर दारू असूनही दारू पिण्याची ती अनिवार ओढ जाणवत नाही ..या अनुभवातूनच निष्कर्ष निघतो की जर दोन दारुडे आपल्याला व्यसनामुळे झालेल्या त्रासांच्या अनुभवांचे कथन प्रमाणिक एकमेकांना करतील ..तर त्यातून बाहेर निघण्याची तात्पुरती शक्ती त्यांना मिळते ..एकमेकांना जीवनाप्रती आशादायक विचार सांगणे ..त्याद्वारे एकमेकांना धीर देणे ..शक्ती देणे ..असे सर्व सार त्यांच्या पहिल्या भेटीतून समोर आले ..त्यातूनच न्यूयार्क मधील अँकॉन या गावी १० जून १९३५ रोजी अल्कोहोलिक्स अँनॉनिमस हि संस्था उदयास आली ..दोनाचे चार ..आठ ..दहा ..असे करत करत हळू हळू मद्यमुक्त होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढू लागली ..आणि आज जगभर लाखो लोक या मिटींग्स द्वारे मद्यमुक्ती मिलीविण्यात यशस्वी होत आहेत ..व्यसनाधीनता या आजारावरील जास्तीत जास्त संशोधन या संस्थेच्या सदस्यांनीच केलेले आहे ..

रोज एकदिवसाच्या तत्वावर मद्यमुक्ती साध्य करणे सहज शक्य होऊ शकते हे अल्कोहोलिक्स अँनॉनिमस च्या सदस्यांनी सिद्ध केलेले आहे .फक्त आवश्यक असते व्यसनी व्यक्तीची व्यसनापासून दूर राहण्याची प्रमाणिक इच्छा ...या संस्थेच्या जगभर रोज मिटींग्स होतात ..ज्यात पूर्वाश्रमीचे दारुडे आपल्या अनुभवाचे शेअरिंग करतात ..आणि मद्यमुक्ती साठी स्वतची तसेच इतरांची शक्ती वाढवण्याचे काम करतात .. ' फक्त आजचा दिवस ' हे प्रमुख तत्व असून ..आजच्या दिवस काहीही झाले तरी दारू घेणार नाही असा निश्चय केला जातो ..असे रोज करत गेले तर पाहता पाहता मद्यमुक्ती साध्य होते असा अनेकांचा अनुभव आहे ...पूर्वी जे दारुडे उद्यापासून सोडतो असे म्हणत असत ..व तो उद्या कधीच येत नसे ..त्याऐवजी ते आता ' फक्त आज पिणार नाही ' इतका मर्यादित निश्चय करतात ..हा छोटा निश्चय निभावणे सोपे जाते या अनुभवातून ' फक्त आजचा दिवस ' हे तत्व उदयास आले आहे .पुढे याच तत्वावर दारू खेरीज इतर मादक द्रव्यांच्या व्यसनींसाठी ' नार्कोटिक्स अँनॉनिमस ' जुगाराचे व्यसन असलेल्यांसाठी ' गँम्बलर्स अँनॉनिमस ' धुम्रपान सोडू इच्छिणार्यांसाठी ' स्मोकर्स अँनॉनिमस ' अश्या इतर अनेक प्रकारच्या घातक व्यसनांसाठी वेगवेगळ्या मिटींग्स सुरु झाल्या ...अनेकांना याचा फायदा होत आहे .. स्वतःच्या विचारत ..वर्तनात ..बदल करत जावून अध्यात्मिक उंची किवा आत्मिक विकास साधण्यासाठी अल्कोहोलीक्स अँनॉनिमस णे व्यक्तिगत सुधारणेसाठी बारा सूचनांचा एक मार्ग तयार केलेला असून ..त्या आचरणाने कायमची मद्यमुक्ती साध्य होऊ शकते असा अनेकांचा अनुभव आहे .

मी खाली अल्कोहोलिक्स अँनॉनिमसचा जनरल सर्व्हिस ऑफिसचा फोन नंबर व वेबसाईट चा पत्ता देत आहे .. सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण तेथे संपर्क करू शकाल ..जर एखाद्या व्यासानीला आपणास मदत करायची इच्छा असेल किवा प्रत्यक्ष व्यसनी व्यक्तीला मदत हवी असेल तर या ठिकाणी संपर्क केल्यास ..आपण भारतातील कोणत्याही शहरात असाल तरीही ..संस्थेचा कार्यकर्ता आपली भेट घेवून आपणास योग्य ती मदत करतो असा अनुभव आहे ...सध्या अँल्कोहोलीक्स अँनँनिमस हा व्यसनमुक्तीचा बऱ्यापैकी यश देणारा मार्ग म्हणून समजला जातो .मी पुढे नवीन लेखमालेत अल्कोहोलिक्स अँनॉनिमस व त्यांच्या सुधारणेच्या बारा सूचनांबद्दल सविस्तर लिहिणारच आहे .

http://www.aagsoindia.org/ ( बाकी पुढील भागात )

नेमके व शास्त्रीय उपचार !


आजार जितका जास्त गंभीर ..जीवघेणा ..तितकेच त्याचे उपचार अधिक अधिक गुंतागुंतीचे असतात ..व्यसनाधीनता या आजाराचे अनेक पैलू असे आहेत ज्यामुळे हा आजारच गुंतागुंतीचा बनलाय...सर्व उपचारांना पुरून उरलेले अनेक व्यसनी मला ठावूक आहेत ..आपला जन्मच जणू व्यसने करण्यासाठी झालाय आणि त्यातच संपायचे असे ठरवल्या सारखे ते वर्तन करतात व शेवटी मृत्यू पत्करतात .. व्यसनमुक्ती साध्य करणे त्यांना शक्य होत नाही ..अर्थात हे प्रमाण जरी लक्षणीय असले तरी सुधारणाऱ्या व्यसनींची संख्या देखील मोठी आहे ..आणि याच आशेने जगभर व्यसनी व्यक्तींना शरीरिक व मानसिक अश्या दोन्ही प्रकारचे उपचार देण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रे कार्यरत आहेत ..जेथे निवासी उपचारांचे आयोजन केले जाते ..व्यसनी व्यक्तीला काही दिवस तेथे रहावे लागते .. त्याची शारीरिक व मानसिक गुलामी काढून टाकण्यासाठी विविध उपचार त्याला दिले जातात .. त्याच प्रमाणे व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडल्यावर ..बाहरेच्या जगात व्यसनमुक्त कसे रहाता येईल याचे प्रशिक्षण देण्यात येते .. व्यसनमुक्ती केंद्राची कार्यपद्धती नेमकी कशी असते हे नीट समजून घेतले तर नक्कीच व्यसनी व त्याचे नातलग व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेवून समर्थपणे या आजाराचा सामना करू शकतील 


व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांसाठी दाखल होणे ही फार कठीण प्रक्रिया नाही ..परंतु व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होण्यासाठी व्यसनी व्यक्तीला तयार करणे ..पालकांची तशी मानसिकता बनणे..हे कदाचित कठीण ठरू शकते ..व्यसनमुक्ती केंद्राबाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत ..त्यातील प्रमुख गैरसमज असा की अगदी टोकाचे नुकसान झाल्यावरच व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावे ..अनेक पालक आमच्याकडे व्यसनी व्यक्तीला दाखल करताना ..तो तसा फार घेत नाही अशीच बोलण्याची सुरवात करतात ...खरे तर जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत पालक पोचतात तेव्हाच आम्हाला खात्री असते की आता प्रमाण जास्त होतेय ..कुटुंबियांना त्रास होण्याचे ..नुकसान होण्याचे प्रमाण वाढलेय ...कारण त्या खेरीज पालक व्यसनमुक्ती केंद्रात येतच नाहीत ..दुसरा गैरसमज असा की व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणाऱ्या व्यक्तीला मारहाण करतात ..बांधून ठेवतात ..वगैरे ..या बाबतीत देखील मी स्पष्ट करू इच्छितो की बांधून ठेवणे ..मारहाण करणे हे काही व्यसनमुक्ती केंद्रातील उपचार नव्हेत ..अगदी तुरळक केसेस मध्ये जेथे व्यसनी व्यक्तीचे व्यसन न मिळाल्यामुळे वर्तन बेफाम होते ..त्याच्या वर्तनामुळे त्याच्या आणि इतरांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो ..अशा केसेस मध्ये काही काळ सुरक्षिततेच्या कारणामुळे व्यसनी व्यक्तीला बांधून ठेवावे लागते ..मात्र मारहाण अजिबात होत नाही ...ज्या व्यसनमुक्ती केंद्रात वारंवार बांधावे लागते किवा मारहाण होते ..अशी व्यसनमुक्ती केंद्रे असतील तर ती नक्कीच शास्त्रीय उपचार देत नाहीयेत असे मी खात्रीने सांगू शकतो ...वरील प्रमुख गैरसमज अनेकदा उपचारांच्या आड येतात .

व्यसनमुक्ती केंद्रे बहुधा सामाजिक संस्था चालवीत असतात ..केंद्र शासनाचे किवा राज्य शासनाचे एखादे अनुदान देखील अशा सामाजिक संस्थाना मिळू शकते .. म्हणून कदाचित या क्षेत्रात देखील केवळ अनुदान मिळवण्याच्या हेतूने काही स्वार्थी किवा लबाड लोक शिरले असावेत ..जगात सर्वत्रच शिक्षण ..अध्यात्म ..व इतर अनेक सामाजिक क्षेत्रात असे लबाड लोक शिरले आहेत जे केवळ पैसा मिळविणे हा एकमात्र हेतू मनी बाळगून लोकांच्या व सरकारच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत असतात ...अशा सामाजिक अथवा शैक्षणिक संस्थावर नियंत्रण ठेवण्याची जवाबदारी असलेले सरकारी अधिकारीही या लाबडीत सामील असतात म्हणूनच हे होऊ शकते ..अशा लोकांना व्यसनाधीनता हा एक गंभीर मनो - शारीरिक आजार आहे हे देखील ठावूक नसते ..ते फक्त अनुदान मिळविण्यासाठीच कार्य करतात ..त्यांना व्यसनी व्यक्तींना उपचार देण्यात काही स्वारस्य नसते ... केवळ व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनीला भरती करून घेणे ..त्याला जेवण ..चहा ..नाश्ता ..मनोरंजन या सुविधा पुरविणे इतकेच काम त्यांना समजते ..माझ्या माहितीत अशी अनेक केंद्रे आहेत जेथे केवळ अनुदान मिळविणे हाच प्रमुख हेतू असतो ..या प्रकारच्या व्यसनमुक्ती केंद्रात योग्य उपचार मिळत नाहीत ..

( योग्य मानसिक उपचार देणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रांच्या कार्यपद्धतीबद्दल पुढील भागात वाचा )

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

व्यसनमुक्ती केंद्र !


जागतिक आरोग्य संघटनेने निर्देशित केलेल्या काही सूचनां नुसारच व्यसनमुक्ती केंद्रे चालवली जावीत असे अभिप्रेत असते ..व्यसनाधीनता या मनो - शारीरिक आजारावर आजवर जेव्हढे संशोधन झालेले आहे त्या वरून व्यसनी व्यक्तीला शारीरिक व मुख्यतः मानसिक सुधारणेसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी व्यसनमुक्ती केंद्रात असल्या पाहिजेत ...तरच योग्य शास्त्रीय उपचार होतोय असे म्हणता येईल ..व्यसनमुक्ती केंद्रांना पुनर्वसन केंद्र ( रिहँबिलीटेशन सेंटर ) असेही म्हणतात ..म्हणजेच बिघडलेल्या सवयी ..बिघडलेले वेळापत्रक ..व्यसनामुळे झालेले नुकसान ..जीवनात आलेली अस्ताव्यस्तता ..गमावलेले मानसिक संतुलन ..आरोग्य हे सर्व पुन्हा जागेवर आणण्यासाठी पुन:प्रस्थापित करण्यासाठी तसेच भविष्यकाळात पुन्हा व्यसन न करता आपले कुटुंबीय ..समाज ..नोकरी ..व्यवसाय या सर्व ठिकाणी पुन्हा आत्मविश्वासाने वावरण्यासाठी केलेली मदत असे म्हणता येईल . मात्र मागील भागात उल्लेख केल्याप्रमाणे केवळ शासनाचे अनुदान मिळवण्यासाठी जी व्यसनमुक्ती केंद्रे चालवली जातात तेथे अशा सुविधा असत नाहीत ..त्यामुळे अशा केंद्रात उपचार देवून व्यसनी व्यक्तीला फारसा फायदा होत नाही .. अशा गल्लाभरू व्यसनमुक्ती केंद्रांमुळे चांगले व प्रामाणिकपणे काम करणारी व्यसनमुक्ती केंद्रे देखील बदनाम होत असतात .जेव्हा एखाद्या व्यसनी व्यक्तीला कुटुंबीय एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात ठेवू इच्छितात त्या वेळी ..त्या व्यसनमुक्ती केंद्रात योग्य शास्त्रीय उपचार दिले जात आहेत किवा नाहीत याची खात्री करूनच तेथे दाखल करणे हितावह ठरेल ...


शारीरिक उपचार____

वारंवार व्यसन केल्यामुळे व्यसनी व्यक्तीच्या शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण झालेल्या असू शकतात ..ज्यात रक्तदाब ..मधुमेह ..लिव्हरची घसरलेली कार्यक्षमता ..कावीळ..स्नायूंचा कमकुवतपणा ..संकोच पावलेल्या रक्तवाहिन्या .. शिवाय आम्लपित्त ...पचनक्रिया मंदावणे ..निस्तेज त्वचा ..भूक न लागणे ..घश्यात जखमा ..असे अनेक प्रकारचे होते ..वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांमध्ये होणारे नुकसान होत असते ..एकंदरीत असे शारीरिक नुकसान झालेल्या व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्यावर प्रथम तेथील फिजिशियन त्या व्यक्तीला तपासून ..आवश्यक त्या तपासण्या करून घेवून ..औषधे सुचवीत असतात ..त्या नुसार ती औषधे पुरवली गेल्यास व्यसनी व्यक्तीची शारीरिक स्थिती चांगली होण्यास मदत मिळते ..काही वेळा व्यसनी व्यक्तीचे इतके नुकसान झालेले असते की व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडल्यावर देखील व्यसनी व्यक्तीला दीर्घकाळ अशी औषधे घ्यावी लागू शकतात .या सर्व कालावधीत पालकांनी वेळोवेळी संबंधित लोकांशी संपर्क करून त्यांना योग्य ते सहकार्य करणे अपेक्षित असते व्यसनीला त्यापूर्वी दिलेल्या उपचारांची संबधित कागदपत्रे जर व्यसनमुक्ती केंद्रात सा दर केली गेली तर योग्य ठरते ....अनेकदा पालक व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले की आता आपली जवाबदारी संपली अशा अविर्भावात असतात ..व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे इस्पितळ नव्हे ..त्यामुळे काही वेळा जास्त नुकसान झालेल्या एखाद्या व्यसनीला काही काळ एखाद्या इस्पितळात ठेवण्याची देखील गरज भासू शकते ..अशा वेळी पालकांनाच तो इस्पितळाचा खर्च करावा लागतो ..अनेक पालकांना याची कल्पना नसते त्यामुळे ते इस्पितळाचा खर्च करण्यास माघार घेवू शकतात किवा इस्पिताळात दाखल केल्यावर तेथे रुग्णाची देखभाल करण्यास तयार नसतात असा अनुभव आहे .

मानसिक उपचार ___

शारीरक आरोग्य सुधारत असतानाच मानसिक उपचारांची सुरवात होत असते ..यात मुख्यतः व्यसनी व्यक्तीला तू बरा होणार आहेस असा विश्वास देणे आवश्यक असते ..त्याच प्रमाणे सुधारणेसाठी आवश्यक असणारी मनोभूमिका तयार करण्यासाठी त्याला वेळोवेळी समुपदेशन केला गेले पाहिजे ..व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करताना पालकांनी जर व्यसनी व्यसनी व्यक्तीचा स्वभाव ..त्याचे गुण अथवा चांगला क्षमता ..त्याच्या स्वभावातील जाणवणारे दोष ..लहानपणापासूनचे वर्तन ..व्यसनामुळे त्याने स्वतचे व कुटुंबियांचे केलेले नुकसान ..वैवाहिक समस्या ..वगैरे बद्दल त्यांना असलेली खरीखुरी माहिती लेखी स्वरुपात व्यसनमुक्ती केंद्रात दिली पाहिजे ..म्हणजे समुपदेशकाला त्या माहितीचा उपयोग करून व्यसनी व्यक्तीला योग्य समुपदेशन करता येते ..व्यसनी व्यक्ती स्वतः अशी सगळी माहिती खरी देईलच याची खात्री नसते ..उलट खोटे बोलण्याच्या सवयीमुळे तो समुपदेशकाशी देखील खोटे बोलू शकतो..माझे फारसे नुकसान झालेले नाहीय असाच त्याचा अविर्भाव असतो त्यामुळे अनेक गोष्टी तो लपवतो ..अनेकदा पालकही काही गोष्टी लपवू इच्छितात ..अशी लपवाछपवी फायदेशीर असत नाही ...मानसिक उपचारात ..समूह उपचार ..डायरी लिहिणे ..व्यक्तिगत समुपदेशन ..समूह चर्चा किवा गटचर्चा अशा विविध गोष्टी येतात .

( बाकी पुढील भागात )

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

योग्याभास व प्राणायाम !


व्यसनमुक्ती केंद्रातील अजून एक महत्वाचा उपचार म्हणजे योगाभ्यास आणि प्राणायाम म्हणता येईल ..महर्षी पतंजली यांनी विकसित केलेले योगशास्त्र आज सवर्दूर मान्यता पावलेले आहे ..योग हा शब्द युज या संस्कृत शब्दावरून आलेला आहे ..युज म्हणजे जोडणे असे म्हणता येईल ..शरीर आणि मन यांच्यात योग्य समन्वय साधण्याचे प्रमुख कार्य योगाद्वारे होते ..मानवी मन मुळातच अतिशय चंचल असते त्यात व्यसनी व्यक्ती म्हंटली की त्याचे मन तर अति चंचल असते .. त्यामुळे एखादी गोष्ट मनावर घेवून ती निभावण्याची त्याची क्षमता संपुष्टात आलेली असते ..तसेच निरनिराळी व्यसन केल्याने त्याचे शरीर देखील दुबळे होत जाते ..स्नायूंची क्षमता ...रक्तवाहिन्यांची क्षमता ..कमी झालेली असते ..व्यसनमुक्ती केंद्रात योगाभ्यास केल्याने या सर्व व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत मिळते ..तसेच मनाची एकाग्रता देखील वाढते ..योगशिक्षक देत असलेल्या सूचनानुसार असणे करणे हितावह असते ..व्यसन मुक्ती केंद्रात व्यसनी व्यक्तीला झेपतील अशा प्रकारची आसने त्याच्याकडून करवून घेतली जातात ..विशेषतः स्नायुंना बळकटी देणे ..शरीराच्या हालचाली सहजतेने घडवून आणणे ..पचनशक्ती सुधारण्यास मदत करणे ..आणि मनाची शांती ..प्रसन्नता टिकवणे ही कार्ये प्रामाणिक पणे योगाभ्यास केल्यास साध्य होतात .


प्राणायाम -

मानवी शरीर जिवंत ठेवण्यासाठी अनेक यंत्रणा निसर्गाने आपल्या शरीरात कार्यरत ठेवल्या आहेत ..श्वासोश्वास ही त्यापैकी प्रमुख यंत्रणा आहे ..प्रत्येक श्वासाद्वारे प्राणवायू किवा उर्जा आपण शरीरात घेत असतो ...श्वास घेताना आणि सोडताना विशिष्ट पद्धतीने तो घेतला गेला तर शरीरात घेतल्या जाणार्या उर्जेचे योग्य नियमन करता येते व त्या उर्जेचा उपयोग शरीर व मन सशक्त करण्यासाठी मदत करता येते हे आता सर्वज्ञात आहे ..अनुलोम विलोम ..कपालभाती ..भस्त्रिका ..भ्रामरी ..असे प्राणायाम नियमित केले तर अनेक फायदे होऊन व्यसनी व्यक्तीला असामान्य अशी शक्ती मिळत जाते ..ही शक्ती तो व्यसनमुक्त राहण्यासाठी आणि अधोगतीकडे चाललेले जीवन प्रगती पथावर नेण्यासाठी वापरू शकतो . अर्थात योगाभ्यास आणि प्राणायाम या दोन गोष्टी कोणालाही सहज करता येण्यासारख्या असूनही ..उगाचच असा सर्वसाधारण गैरसमज आढळतो की या गोष्टी योगी पुरुषांनी ..साधू सन्यासी लोकांनी करायच्या असतात ..सर्वसामान्य माणसाचे हे काम नव्हे ..या गैरसमजांमुळे अनेक लोक या बाबतीत जरा टाळाटाळ करण्याच्या प्रवृत्तीचे असतात ..व्यसनमुक्ती केंद्रात देखील उपचार घेणारे मित्र बहुधा योगाभ्यास आणि प्राणायाम करण्याचा कंटाळाच करतात ..तसे न करता जर मनापासून या उपचारात सहभाग घेतला तर नक्कीच सुधारणा अधिक सोपी होते ..वाचकांनी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असणारी या विषयावरची पुस्तके वाचली तर त्यांना बरीच उपयुक्त माहिती मिळेल .

समूह चर्चा -

व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असलेल्या मित्रांची जात.. धर्म..संस्कृती ..शैक्षणिक अथवा आर्थिक स्थिती ..वैवाहिक स्थिती ..वगैरे जरी वेगवेगळी असली तर सर्वांची समस्या आणि झालेले नुकसान मात्र सर्वसाधारण सारखेच असते ..अश्या वेळी व्यसनांचे जीवघेणे आकर्षण ..त्यावर मात करण्यासाठी असणारी मानसिकता ..पुन्हा व्यसनाकडे जाण्यास प्रवृत्त करणारी परिस्थिती ..बचाव करण्याच्या पद्धती ..भावनिक असंतुलन ..जीवनाबद्दलचा अविवेकी दृष्टीकोन ..अश्या विविध विषयांवर समूह उपचारक समूहात चर्चा घडवून आणण्याचे काम करतो ..या द्वारे व्यसनी व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो ..तसेच व्यसनाधीनता या आजाराची सखोल माहिती मिळून ..स्वतःला सांभाळण्यासाठी आपण नेमके काय काय करू शकतो हे त्याला समजण्यास मदत मिळते ..व्यसनाधीनतेमुळे होणार्या नेमक्या हानीची स्पष्ट कल्पना येवून ..आपण क्षणिक आनंदासाठी केवढा मूर्खपणा करत होते हे लक्षात येते .

( बाकी पुढील भागात )

व्यक्तिगत समुपदेशन !


व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनी व्यक्ती दाखल झाल्यावर सुरवातीचे सुमारे आठ दिवस त्याला त्याचे व्यसन न मिळाल्यामुळे अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास उद्भवतात ...शास्त्रीय भाषेत या त्रासांना विरहलक्षणे ( विड्रॉवल सिम्पटम्स ) असे म्हणतात..यात प्रामुख्याने घाबरल्या सारखे होणे .. रक्तदाब वाढणे किवा कमी होणे ..अंग दुखणे ..हातापायांची थरथर होणे ..भूक न लागणे ..आम्लपित वाढून उलट्या होणे ..जुलाब होणे ..झोप न लागणे ...ही लक्षणे असतात ..काही लोकांना या अवस्थेत फिटस ( फेफरे ) देखील येवू शकतात ..कारण मेंदूला व्यसनाची सवय झालेली असल्याने ..एकदम व्यसन बंद झाले कि मेंदू त्याचे काम नीट पाने करत नाही व एकदम झटका बसल्यासारखी फिट येवू शकते .. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता वेगवेगळी असते .त्यामुळे सर्वांनाच फिट येईल असे नाही ..मात्र येणारच नाही असेही नसते .. व्यसनामुळे मेंदूची नेमकी किती हानी होतेय हे मोजण्याचे नेमके साधन सध्या तरी उपलब्ध नाहीय ..त्यामुळे कोणताही व्यसनी आपल्याला कधीच फिट येणार नाही असे म्हणू शकत नाही ..केव्हातरी त्याचा मेंदू त्याला दगा देतो ...फिट येणे ( इपिलेप्सी ) हा एक आजार आहे मात्र व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत फिट येणे हे व्यसनामुळे मेंदूचे नुकसान होत असल्याचे प्रमाण आहे .. ..तो मेंदूने व्यसनाच्या बाबतीत दिलेला सावधगिरीचा इशारा असतो ..त्यापुढेही व्यसन थांबले नाही तर ..मेंदू हमखास केव्हाही दगा देणार व जीवन धोक्यात येणार हा निश्चित ...फिट येण्याप्रमाणेच एक हँलुस्नेषन नावाचा प्रकार काही व्यासानिमध्ये व्यसन न मिळाल्यास उद्भवतो ..म्हणजे नियमित व्यसन न मिळाल्याने व्यसनी व्यक्तीचा मेंदू त्याचे नियमित काम नीट करत नाही व त्या व्यक्तीला वेगवेगळे भास होतात ..( माझ्या ब्लाँगवर 'बेवड्याची डायरी ' या भागात मी याबद्दल सविस्तर लिहिलेच आहे ) ..अश्या वेळी व्यसनी व्यक्तीची काळजी घेण्याची गरज असते ..


विरहलक्षणांच्या या काळात व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्राच्या बाहेर जाण्याची खुप ओढ असते ....तो व्यसनमुक्ती केंद्रातील कार्यकर्त्यांच्या कडे घरी फोन करण्यासाठी ..डिस्चार्ज साठी ..बाहेर जाण्यासाठी खूप हट्ट करतो ..अशा वेळी त्याला वेळोवेळी धीर देवून हा त्रास फक्त काही दिवसांचा आहे हे समजावून सांगावे लागते ..त्रास सहन करण्यासाठी जरी औषधे दिली गेली असली तरी त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम समुपदेशनाने अधिक चांगल्या प्रकारे होते ...तू लवकरच या त्रासातून बाहेर पडून चांगला होशील ..व्यसनमुक्त होशील ..तुला काहीही त्रास झाला तरी आम्ही तुझी काळजी घेत आहोत असे त्याला वारंवार पटवून द्यावे लागते ..त्याच्या फोन करण्याच्या किवा घरी जावू देण्याच्या हट्टाला बळी न पडता ..सहनशीलपणे त्याला हाताळावे लागते ..अशा काळात जर त्याचे कुटुंबीय त्याला भेटले तर तो त्यांना इमोशनल ब्लँकमेल करून ..दमदाटी करून ..खोट्या शपथ वचने घेवून डिस्चार्ज घेण्यास भाग पाडू शकतो म्हणून पालकांनी या काळात व्यसनी व्यक्तीशी अजिबात संपर्क साधता कामा नये ..व्यसनमुक्ती केंद्रात व्यक्ती दाखल झाल्यावर सुमारे पंधरा दिवसानीच पालकांनी त्याची भेट घेतली तर अधिक बरे असते ..तेदेखील समुपदेशकांच्या सूचनानुसारच भेटले पाहिजे ..मात्र काही पालक त्या व्यसनी व्यक्तीच्या बाबत इतके हळवे किवा संवेदनशील असतात की ते व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्यापासून खूप अवस्थ होतात ..वारंवार व्यसनमुक्ती केंद्रात फोन करून ..जेवला का ? झोपला का > काय जेवला ? काही म्ह्णतो का ? आम्हाला दोष देतो का ? असे प्रश्न विचारून तसेच त्याच्याशी आम्हाला बोलू द्या म्हणून हट्ट करतात ..खूप वैताग येतो..अशा पालकांना उत्तरे देण्यास व त्यांना भेटू नका म्हणून समजावून सांगता सांगता कार्यकर्त्याच्या नाकीनऊ येतात ...तेव्हा आपला माणूस एकदा व्यसनमुक्ती केंद्राच्या ह अवली केल्यावर तेथील समुपदेशक व कार्यकर्ते यांच्या सूचनानुसार पालकांनी वागले तरच यश मिळण्याची शक्यता वाढते .

विरहलक्षणे संपल्यावर देखील व्यसनी व्यक्तीला समुपदेशनाची गरज असते .. त्याच्या आयुष्यात त्याने नेमक्या काय चुका केल्या हे त्याला शोधण्यास लावणे ..त्याचुका स्वीकार करून पुन्हा त्या चुका न होण्यासाठी सकरात्मक दृष्टीकोन देणे ..वेळोवेळी निर्माण होणार्या भावनिक आवेगांशी जुळवून घेण्याचे तंत्र ..त्याच्या व्यसनामुळे झालेल्या नुकसानाची ..इतरांचा झालेल्या त्रासाची ..त्याचा अहंकार न दुखावता त्याला जाणीव करून देणे ..भविष्यकाळात व्यसनमुक्त राहून नवीन आयुष्य उभारण्यासाठी आत्मविश्वास व मार्गदर्शन करण्याचे काम सामुपदेशकाचे असते ..या सर्व काळात व्यसनी व्यक्ती आणि समुपदेशक यांच्यात एक विश्वासाचेनाते निर्माण होते ..त्यासाठी समुपदेशकाने सावधगिरीने बोलणे महत्वाचे असते ..व्यसनी व्यक्तीचा अहंकार न दुखावता ..त्याला दोष न देता ..किवा त्याच्या भावनांमध्ये वाहून न जाता अलिप्तपणे हे सर्व करण्यासाठी समुपदेशकाकडे खूप समंजसपण असणे गरजेचे असते .

( बाकी पुढील भागात )